अलिबाग - किरकोळ कारणावरून मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा येथे ही घटना घडली. गणेश रामचंद्र कुबल असं मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. लांडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल गणेश कुबल (२६) रा. रांजणपाडा असे या आरोपी मुलाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. व्यायामाची आवड असलेल्या कुणाल याने आपल्या आईकडे जेवणासाठी मच्छीची मागणी केली होती. मात्र तिने नकार दिला. त्यामुळे संतापलेला कुणाल रागाच्या भरात घराबाहेर पडला, रात्री आल्यावर त्याने आई-वडिलांशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. जेवणाचा टोपही फेकून दिला. त्यामुळे वाद विकोपाला गेला. त्याने वडिलांना हाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांच्या जोरदार कानाखाली मारली. या मारहाणीत ते लादीवर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हेही वाचा - परभणीत महायुतीचे धक्कातंत्र हेही वाचा - रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा हेही वाचा - महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अधिकच किचकट दुसऱ्या दिवशी त्यांना उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, अधिक उपचारासाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात उपचार सुुरू असताना धुळीवंदनाच्या दिवशी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूला मुलगा कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत आरती कुबल यांनी कुणालविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर याप्रकरणी मुलाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.