मिरजेच्या भारतनगरमध्ये मंगळवारी झालेली आगीची दुर्घटना अवैध गॅस भरतीतून घडल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने  या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. या दुर्घटनेत दहा जण भाजून जखमी झाले असून त्यापकी चौघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
भारतनगरमध्ये बठय़ा घरांच्या चाळीत मंगळवारी सायंकाळी आगीची दुर्घटना घडली. भाडेकरु राहत असलेल्या या चाळीत अब्दुल फारुख बारगीर (२८), अलताफ युसूफ शेख (२१) व जुबेर रफिक गोलंदाज (२२) हे तिघे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून रिक्षा व चार चाकी वाहनांसाठी गॅस विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाले असून या तिघांविरुद्ध श्रीमती शोभा देसाई यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
अलताफ शेख हा मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सिलेंडरमधील गॅस विद्युत पंपाने बाहेर काढून दुसऱ्या टाकीत भरत होता. गॅस तसाच सुरु ठेवून खोलीला कुलूप लावून तो बाहेर गेला. फिर्यादी श्रीमती देसाई यांनी विजय सन्नके यांच्यासमवेत खोलीचे कुलूप काढून पाहिले असता खोलीत गॅस पसरला असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी गॅसची गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात दहाजण जखमी झाले. तर बठय़ा चाळीतील ६ कुटुंबांच्या प्रापंचिक साहित्याची हानी झाली.
या दुर्घटनेत सुरज ऐनापुरे (१४), मुबारक बागवान (३०), आरिफ मणेर (२१) अलताफ शेख (२१), श्रीमती सुधा केंद्रे (६५) श्रीमती लक्ष्मी स्वामी (४३), श्रीमती शोभा देसाई (३५), समिना सय्यद (६०), आर्यन देसाई (५) व आदित्य केंद्रे (१२) हे दहा जण जखमी झाले आहेत. या सर्वाना उपचारासाठी वान्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या स्फोट प्रकरणी अब्दुल बारगीर व जुबेर गोलंदाज या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना दि.३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत वित्तहानी नेमकी किती झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळाहून ९ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.