परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून येत्या रविवारी (दि.८) पाथरी येथे त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बराच काळ बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले होते. पुढे त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते या पक्षाचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यानंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगरात झालेल्या एका कार्यक्रमात बाबाजानी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपासून ते राजकीय निर्णय घेण्याबाबत विचारात होते. आता पुन्हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
बाबाजानी हे शरद पवारांचे जुने समर्थक आहेत. आपल्या राजकारणातला दीर्घकाळ त्यांनी पवारांच्याच नेतृत्वाखाली काम केले आहे. १९८० पासून ते पवारांसोबत आहेत. त्या वेळच्या एस. काँग्रेसमध्येही ते होते. चरख्याच्या चिन्हावर त्याकाळी मराठवाड्यात पाथरी, परतूर आणि उस्मानाबाद या तीन नगरपरिषदा निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर परभणीचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून बाबाजानी यांनीच जबाबदारी पार पाडली होती. अगदी अलीकडेपर्यंत ते या पक्षाचे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष राहिले. स्वतः अल्पसंख्य समाजातून येत असले तरीही जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी मुख्य प्रवाहातलेच राजकारण केले आहे. पाथरी नगरपालिकेवर त्यांचे गेली अनेक दशके एकहाती वर्चस्व राहिले. पाथरी या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००४ ते २००९ या काळात प्रतिनिधित्व केले. त्यानंतर दोन वेळा ते विधान परिषदेवर आमदार होते.
२०१२ ते २०१८ या काळात परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना आमदारकीची संधी मिळाली आणि दुसऱ्यांदा ते २०१८ साली पुन्हा राष्ट्रवादीच्या कोट्यातून बिनविरोध आमदार झाले होते. अशाप्रकारे बाबाजानी यांना विधिमंडळात तीन वेळा संधी मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डावरही त्यांनी काम केले आहे. वस्तुतः राष्ट्रवादीतल्या पक्षफुटीनंतर आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते मात्र मतदारसंघातल्या विरोधकांकडून कोंडी होत असल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. काही काळ ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहिले. त्यानंतर पुन्हा त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात ‘कुछ तो मजबुरिया रही होगी, वरना युही कोई बेवफा नही होता’ असा शेर त्यांनी शरद पवारांसमोर ऐकवला. तरीही पक्ष सोडताना आपली कोणतीही मजबुरी नव्हती असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत बाबाजानी यांनी अलिप्तता स्वीकारल्याने पक्षनेतृत्व आणि त्यांच्यात अंतर पडत गेले. बाबाजानी यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत असतानाच त्यांचे आणखी एक स्थानिक विरोधक राजेश विटेकर यांना पक्षाने विधान परिषदेची संधी दिली त्यामुळेही बाबाजानी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटात अस्वस्थ होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा पाथरी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. आता विटेकर व बाबाजानी यांच्यातही सख्य दिसून येत आहे.
अजित पवारांचे राजकारण पुरोगामीच
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार समान आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची साथ सोडली नाही. आपण आजवर सातत्याने पुरोगामी राजकारण केलेले आहे. पुरोगामी राजकारणाची कास आपण कदापिही सोडणार नाही. अजित पवार यांनी कधीही राजकारणात जातीचा, धर्माचा विचार केला नाही. ते व्यापक राजकारण करतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे.