नुकतंच नितीन नांदगावर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. परंतु त्यांनी आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला याचं कारणं सांगितलं आहे. "आपण सुरू केलेल्या जनता दरबारात अनेक ठिकाणाहून लोक त्यांच्या समस्या मांडण्यासाठी येत होते. त्यांचे प्रश्नही त्या माध्यमातून सोडवण्याचा मी प्रयत्न केला. या जनता दरबारामुळे मिळालेली लोकप्रियता काही मनसेच्या नेत्यांना खटकली आणि त्यांच्यामुळे जनता दरबार बंद करावा लागला. तसंच हा जनता दरबार कायमचा बंद करण्यास सांगण्यात आलं. तसंच मनसेच्या काही नेत्यांनी हं हवं असल्यास तू तुझा पक्ष काढ असंही सांगून टाकलं. दरबाराच्या माध्यमातून जनतेची सेवा करता येत नसल्यानं अखेर मला मोठा निर्णय घ्यावा लागला आणि आपण शिवसेसेनेत प्रवेश केला" असल्याचं नितीन नांदगावकर म्हणाले. त्यांनी फेसबुकवर यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. "मनसे सोडल्यानंतर अनेकांनी मला ट्रोल केलं. परंतु त्यांनी मी मनसे का सोडली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रवासादरम्यान, अनेकदा राज ठाकरे यांची मोलाची साथही लाभली. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार सुरू केला. अगदी कमी काळात तो लोकप्रियही झाला. परंतु वाढती लोकप्रियता ही पक्षातील काही बड्या नेत्यांना खटकली. यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. परिणामी जनता दरबार बंदही करावा लागला," असं नांदगावकर म्हणाले. "आपल्या पक्षातला एखादा कार्यकर्ता मोठा होतो, तेव्हा पक्षाने त्याकडे अभिमानानं पाहिलं पाहिजे. पण याठिकाणी तसं झालं नाही. मी कधी आमदारकी आणि खासदारकीसाठीही इच्छुक नव्हतो. केवळ जनता दरबार सुरू ठेवण्याची विनंती केली होती. पण त्यावेळी काही बड्या नेत्यांतकडून तू तुझा पक्ष काढ असं सांगण्यात आलं," असंही त्यांनी नमूद केलं. "ज्यावेळी मी तुरूंगात होतो तेव्हा मनसेचा कोणताही नेता भेटायला किंवा विचारपूस करायला आला नाही. पण जनता दरबार कायमचा बंद करण्यास सांगितला तेव्ही काही निर्णय घेण्याचं ठरवलं. आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला तिकडेही आमदारकी आणि खासदारकी मिळवण्याची इच्छा नाही. त्या माध्यमातूनही आता जनतेची सेवा करणार आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील आपल्याला कामाची मोकळीक दिली आहे," असंही नांदगावकर यांनी सांगितलं.