आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे सरकार असा करतात. मात्र गेल्या अडीच वर्षात ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिंधे झाले होते अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. एवढंच नाही तर ठाण्यातल्या गटई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. आपणही तसाच संघर्ष केला आहे. त्यामुळेच आम्हा दोघांमध्ये एकवाक्यता आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. म्हणून ते चुकीचे आरोप करीत आहेत. परंतु, आजचे सरकार हे दलित, आदिवासी, गोरगरीब लोकांचे सरकार आहे असंही कवाडे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाष्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जागावाटपावर नवं वक्तव्य केलं. त्यामुळे ते आधी काही वक्तव्य केलं ते लक्षात घेऊ नका. आज बावनकुळेंनी सांगितलं आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्हीही एकनाथ शिंदेंसोबतच आहोत. त्यामुळे कोणतीही निवडणूक आली. मग ती महापालिका, नगरपालिका, विधानसभा किंवा लोकसभा असेल आमच्या पक्षाचाही विचार भाजपाला करावा लागेल असंही जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि जयंत पाटील ज्योतिषी आहेत का? अजित पवार म्हणतात हे सरकार जाणार आहे, जयंत पाटील म्हणतात हे सरकार जाणार आहे. हे काय ज्योतिषी आहेत का? जर असतील तर महाविकास आघाडी सरकार बुडणार आहे हे या दोघांना कळलं नाही का? असाही प्रश्न जोगेंद्र कवाडेंनी विचारला आहे. आमची आघाडी फक्त सत्तेसाठी नाही. तर सत्तेच्या माध्यमातून समाजातला जो नाही रे वर्ग आहे म्हणजे दलित आहेत, गरीब आहेत, मजूर आहेत त्यांच्या दारापर्यंत विकासाची गंगा कशी न्यायची आहे हे आमचं लक्ष्य आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमच्या पक्षाने आघाडी केली आहे. गरीबांना न्याय देण्याचं काम आमची शिवशक्ती आणि भीमशक्ती करेल असंही कवाडे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी खेड येथील गोळीबार मैदानात जी सभा घेतली त्या सभेत एकनाथ शिंदेंवर वाट्टेल ते आरोप केले. त्या सभेला उत्तर देण्यासाठी गोळीबार मैदानावर एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत. विराट सभा आयोजित करण्यात आली आहे असंही जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे.