प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर पुढील प्रवेश
मुंबई : यंदा दहावीचा शंभर टक्के निकाल जाहीर होऊनही आणि चार प्रवेश फेऱ्यांनंतर राज्यात अकरावीच्या दोन लाखांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. अद्यापही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता रिक्त जागांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. ही फेरी मंगळवारपासून सुरू होणार आहे.
यंदा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची संधी मिळणार याबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात चार प्रवेश फेऱ्या झाल्यानंतरही राज्यात अकरावीच्या जवळपास दोन लाख जागा रिक्त आहेत.
अकरावीच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या झाल्या. त्यानंतर एक विशेष फेरी घेण्यात आली. यंदा राज्यातील १४९६ महाविद्यालयांमध्ये ५ लाख ३४ हजार १५० प्रवेश क्षमता होती. विशेष प्रवेश फेरीनंतर यातील ३ लाख १५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून २ लाख ३४ हजार १३५ जागा रिक्त राहिल्या आहेत.
प्रवेशाची आणखी एक संधी
आता रिक्त राहिलेल्या जागांवरील प्रवेशसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर’ प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार त्यांचे गट करून प्रवेश देण्यात येतील. ही फेरी मंगळवारपासून सुरू होणार आहे. प्रवेश अर्जाचा पहिला भाग प्रमाणित केलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र असतील.
प्रवेशाची सद्यस्थिती
विभाग प्रवेश झालेले रिक्त
क्षमता प्रवेश जागा
मुंबई ३२०७४० १८४७०१ १३६०३९
नाशिक २५३८० १६५४५ ८८३५
पुणे ११३१६५ ६०८७८ ५२२८७
प्रवेश फेरीचे वेळापत्रक
९० ते १०० टक्के गुण : २८ सप्टेंबर सकाळी १० ते २९ सप्टेंबर सकाळी १० वाजेपर्यंत – ऑनलाईन अर्ज भरणे
२८ सप्टेंबर सकाळी १० ते २९ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत – मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे