रत्नागिरी : कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक समस्या संपली असली तरीही वर्ग ३, वर्ग ४ ची सुमारे ३८१ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा खूपच दुबळी झाली होती. त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून कंत्राटी तत्त्वावर चांगले मानधन देऊन एमबीबीएस पदवीधर वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हास्तरावर भरती करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शासनाने ४० हजार रुपये मानधनावर कंत्राटी म्हणून या नियुक्त्या करण्याचे अधिकारी जिल्हा स्तरावर आरोग्य विभागाला दिले. जिल्हा परिषदेची ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून प्रत्येक केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी या प्रमाणात एकूण १४१ पदे मंजूर होती. ती सर्व भरलेली आहेत. परंतु वर्ग ३ ची ३०९ आणि वर्ग ४ संवर्गातील ७२ रिक्त पदे रिक्त असून गेल्या काही वर्षांंत नव्याने भरती न झाल्यामुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, परिचर हे कर्मचार प्रत्यक्ष रुग्णाची देखभाल करण्यासाठी नियुक्त केले गेले आहेत. वैद्यकीय अधिकारी उपचार करत असतात, तर रुग्णांना अन्य सेवा देण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर असते. पण हा पायाच डळमळायला लागल्याने ही सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सगळ्याच आरोग्य केंद्रांमध्ये ही परिस्थिती आहे. दुर्गम गावांमध्ये याचा सर्वाधिक फटका बसत आहे. सेवानिवृत्तीने पद रिक्त झाल्यावर तेथे नियुक्ती कशी द्यायची असा प्रश्न तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना पडतो. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे तात्पुरती नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला तर यामधून सावरणे शक्य आहे. त्याचे अधिकार जिल्हा स्तरावर दिल्यास उपयुक्त ठरेल. अन्यथा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे. दरम्यान या संदर्भात दर महिन्याला पत्र पाठवून शासनाला माहिती दिली जाते. पण नवीन भरतीबाबत अजूनही निर्णय झालेला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली. रिक्त पदांची स्थिती पद भरलेली रिक्त औषध निर्माता ३१ ३७ आरोग्य पर्यवेक्षक ० २ आरोग्य सेवक १३७ ७२ आरोग्य सेविका २८५ १९८ स्त्री परिचर ३३ ३४ सफाई कामगार २९ ३८