२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता. महायुतीतील सरकारला जनादेश मिळाला तरीही शिवसेना आणि भाजपा यांच्यातील अंतर्गत वादामुळे महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलं. परिणामी मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवरून त्यांना प्रचंड डिवचलं गेलं. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आता चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते ‘काँग्रेस ना होती तो क्या होता’ या पुस्तकावर आधारित परिसंवादात बोलत होते.

“सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसली. यशासारखे काहीही यशस्वी होत नाही, असं म्हटलं जातं. मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. आम्ही निवडून आलो. पण आमचं सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे आम्हाला काहीजण अहंकारी म्हणाले. हे तर राजकारणात सुरुच राहतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन. त्याला अडीच वर्षे लागली. परंतु, अडीच वर्षांनी आलो तर असा आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो”, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> मोठी बातमी! ठाकरे गटाचा महत्त्वाचा शिलेदार शिंदे गटात सामील, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

देवेंद्र फडणवीसांचा हा व्हीडिओ शेअर करत विरोधकांनीही टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, “राज्यातील पक्ष आणि कुटुंबं फोडाफोडीचे महामेरू कोण आहेत याबाबत लोकांमध्ये चर्चा होती. पण आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच याची कबुली दिल्याने लोकांमधील चर्चेवर शिक्कामोर्तब झालं. पण फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची निती राबवणाऱ्या भाजपाला राज्यातील स्वाभिमानी जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!”

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होईल अशी चिन्ह होती. परंतु, अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाली. महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले. अडीच वर्षे महाविकास आघाडीने सरकार चालवलं. परंतु, जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आणि महाविकास आघाडीला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर लागलीच वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. त्यामुळे दोन्ही पक्षांना फोडून मी पुन्हा आलो असं फडणवीस म्हणाले.