सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे रविवारचे हे अंतिम पुष्प. हे सत्र सुरू होण्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांच्या केवळ ९ वर्षे वयाच्या नातवाचे, विराज याचे गायन झाले. आजोबांची जिद्द या तिसऱ्या पिढीत उतरली आहे. ‘रामाचे भजन हेचि माझे ध्यान’ हा संतश्रेष्ठ रामदास स्वामींचा अभंग खूप सुरेख गायला. यानंतर ‘माझे माहेर पंढरी’ हा दुसरा अभंग, शेवटी ‘बाजे रे मुरलिया’ हे पंडित भीमसेन जोशींचे प्रसिद्ध भजन.
सर्व गायन लयबद्ध, सुरेल व सुरेख झाले. अनेकांनी प्रोत्साहन म्हणून रोख रुपयांचे  बक्षीस दिले. गायन साथ पं. श्रीनिवास जोशी यांची होती. तबला- प्रशांत पांडव, स्वरसंवादिनी- अविनाश दिघे, तानपुरा- बाळासाहेब मिरजकर.
मध्यंतरात या महोत्सवामध्ये पंडित भीमसेनजींच्या परदेशातील गायनाची दृक्श्राव्य तबकडी दाखवली. वंृदावनी सारंग झपतालात इतका घाम गाळून मेहनतीने गायला आहे की बस्स! हे एवढे मोठे स्वरमंदिर अशा मोठय़ा माणसांच्या घामावर बांधले आहे. जिवापाड कष्ट आणि कष्ट, याचे हे फळ आहे असे म्हणावे लागेल. त्यानंतर भजन.
यानंतर दुपारच्या सत्रामध्ये अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे बहारदार गायन झाले. आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर घराण्यांचे उचित संस्कार झालेल्या या गायिका आहेत. पं. उल्हास कशाळकर, पं. शंकर अभ्यंकर यांच्या या शिष्या. सर्वप्रथम राग मूलतानी सुमरा तालात त्यांच्या अंगभूत सौंदर्यासह सुरेख पेश केला. विलंबितचे बोल होते ‘कवण देस’, तर द्रुताचे बोल ‘ओ मोरे मंदिरवा में’ त्रितालात.
दुसरा राग निवडला तो मारवा. सायंकालीन राग. या रागामधील सर्व आलाप, ताना अवरोही असाव्यात.
रिषभ किंचित चढा लावावा. षड्ज स्वराशी एकदम फारकत घेतल्यासारखा. षड्ज कमीत कमी वापरून रिषभ, धैवत, स्वयंवर न्यास. असे काही लिखित, अलिखित संकेत जर पाळले तर सायंकालीन वातावरणनिर्मिती होते. या वेळी पशुपक्षी, मानव सर्व आपल्या घराच्या एका अनामिक ओढीने घराकडे धावत सुटतात. दिनमणी अस्तास जात असताना अंधाराचे साम्राज्य हळूहळू पसरत जाते. त्यामुळे मनात, वातावरणात एकप्रकारचे औदासीन्य येते. हे सर्व या रागामधून वरील पथ्य पाळल्यास विशेष दिसून येते. याचा अनुभव या गायिकांनी श्रोत्यांना दिला. प्रत्येक आलाप, तानांमध्ये अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवून सुरेख सादरीकरण केले.
मारव्यातील ‘ये माई मझधार’ ही बंदिश तिलवाडय़ात, तर ‘ओ कोई गुनिजन’ ही मध्य एकतालातील बंदिश उपजत आवाजामधील गोडव्याने छान मजली. संत कबीराच्या ‘अब तू माया’ या भजनाने आपले गायन संपविले.
मियाँ तानसेनाचा जीव वाचविण्यासाठी मल्हार राग गाणाऱ्या तानी, नानीसारख्या एकमेकांशी सुखसंवाद करीत गाणाऱ्या गायिका वाटत होत्या. मियाँ तानसेन तानी-नानी यांचे ‘ओम तानी नानी’ म्हणत आपल्या गायनाची सुरुवात करीत असे. यातूनच तराणा हा गानप्रकार जन्माला आला. प्रसिद्ध पावला.
आजच्या या सुरेल गायनाला साथ अशी होती. स्वरसंवादिनी- सुयोग कुंडलकर, तबला- भरत कामत, तंबोरा- राजसी व मनाली खरे.
यानंतर स्वरमंचावर पं. शौनक अभिषेकी यांचे गायन झाले. सर्वप्रथम ‘अमृतवर्षिणी’ हा राग झुमऱ्यामध्ये सादर केला. जबरदस्त आत्मविश्वास, आलापामधील स्वरावरील न्यास, समेवर येण्याचे विविध प्रकार, अचूक स्वरलगाव यांनी, तसेच बेहेलावे, स्वरांवरील आंदोलने याने हे गाणे समृद्ध असे होते. ‘अद अनाद अनाम’ असे या अमृतवर्षिणीच्या बंदिशीचे मुख होते, तर याच रागामधील ‘का संग की प्रीत’ हे या मध्य एकतालामधील बंदिशीचे बोल होते.
यानंतर अडाणा रागामध्ये रामरंग या बंदिशकारांची ‘भवानी दयानी जननी’ एकतालात बांधलेली ही बंदिश अतिशय उत्साहाचे वातावरण शामियान्यात पसरून गेली. याच रागामधील एक तराणा द्रुत त्रितालात सादर केला.
शेवटी बोरकरांची भावस्पर्शी कविता. ‘नाही पुण्याची मोजणी’ सादर केली. अभिषेकीबुवांच्या अनेक जागांचा पुन:प्रत्यय आला.
असे हे देखणे गायन श्रोत्यांच्या कायम स्मरणात राहणार आहे. यांना स्वरसंवादिनी साथ- उदय कुलकर्णी, तबला- हर्षद कानेटकर, तर स्वरसाथ- महेश काळे यांची होती.
यानंतर स्वरमंचावर पं. परमेश्वर हेगडे यांनी भारतीय अभिजात संगीतामधील ‘शुद्ध कल्याण’ रागातील ‘बोलन लागी अखियाँ’ ही चिरपरिचित बंदिश खूप ताकदीने सादर केली. आलापी तीही अत्यंत लयबद्ध, प्रत्येक स्वराचा प्रथम आनंद मला मिळाला पाहिजे ही गाण्याकडून अपेक्षा, लयीतच प्रत्येक आलापी झाली पाहिजे असा आग्रह व त्यानुसार अंमलबजावणी, असे हे पूर्ण समरसतेने गायलेले राग गायन सर्वत्र शांतता पसरून गेले.  पं. ओंकारनाथ ठाकूर यांची ही बंदिश, ठायी ठायी त्यांचे स्मरण करून देत होती. त्यांच्या अनेक सुरावटींमधील जागा ऐकल्या, की ‘कलाकार अमर असतो’ असे का म्हटले आहे याची साक्ष हे गायन ऐकल्यावर श्रोत्यांना पटले.
या रागाचा शेवट ‘मंगल गा’ या त्रितालामधील बंदिशीने केला. यानंतर शहाना कानडामधील ‘सुंदर अंगना दौ’ ही बंदिश त्रितालामध्ये तानांच्या सौंदर्यपूर्ण आविष्काराने सादर केली. शेवटी गुरू नानकांचे ‘सुमीरन करो मेरे मना’ हे भजन या हिशेबी जगाची व्यर्थता दाखवून गेले. श्रोत्यांच्या अंत:करणाची पकड घेण्याचे स्वरसामथ्र्य या गायकाकडे निश्चितच आहे. त्यांना स्वरसंवादिनीवर साथ अविनाश दिघे यांची, तर तबल्यावर रवींद्र यावगल यांची होती. श्रुतीवर राजश्री महाजन व लक्ष्मण अवधानी यांची होती.
यानंतर उस्ताद शाहिद परवेझ (सतार) आणि पं. अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) यांनी सहवादनामधून राग चारुकेशी सादरीकरणासाठी निवडला. या रागामध्ये रेगम शुद्ध तर ध व नि हे स्वर कोमल आहेत. द्रविड संस्कृतीच्या मुशीतून बाहेर आलेला हा राग आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये कुठल्याही थाटात बसत नाही, पण माधुर्याच्या बाबतीत जराही कमी नाही, हे याचे खास वैशिष्टय़!
उस्ताद शाहिद परवेझ हे इटावा घराण्याचे, तर उपाध्ये हे पं. भास्करबुवा बखले यांच्या परंपरेतले. आध्यात्मिक वादनाचा समृद्ध वारसा लाभलेले.
सुरुवात आलापीने झाली. आलाप जोड झाला पद्धतीचे हे सादरीकरण एकमेकांच्या हातात हात घालून प्रेमपूर्वक चालू होते. मात्र सुरुवातीच्या आलापीमध्ये पं. रविशंकर वाजवत तसे जवारीच्या तारेचे काम कुठे दाखवले गेले नाही. खर्ज सप्तक दाखविल्यावर एक वेगळाच आकृतिबंध डोळय़ांसमोर उभा राहतो. पण बहुधा घराण्याची भिंत आडवी आली असावी असे वाटते. प्रत्येक घराण्याचे जे चांगले ते घ्यावेच घ्यावे. सरस्वतीचे आपण उपासक. घराण्या घराण्यामध्ये उभ्या भिंती न बांधता पूल बांधू या. जवारीची तार वाजविण्याची पद्धत सर्वानीच आचरावी हे यानिमित्त सांगणे पं. रविशंकरजींना श्रद्धांजली ठरेल.
मुकेश जाधव यांनी तबल्यावर विविध सवाल जवाब, रेते तुकडे यांनी समृद्ध साथ केली. शेवटी श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव मिश्र पिलू वाजवून आपले वादन संपविले.
यानंतरचे कलाकार पं. उपेंद्र भट हे पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य, किराणा घराण्याची समृद्ध परंपरा जपणारे वारस. पंडितजींच्या वेषभूषेपासून वागण्या-बोलण्यापासून अनुकरण करणारे, विनयी गायक. ‘‘मोठय़ा आदरणीयांचे अनुकरण करा, तुमचे आयुष्यही अनुकरणीय होईल’’ या सिद्धान्तानुसार पं. उपेंद्रजींची अवस्था ‘‘देवासी भेटावयासी गेलो तेथे देवचि होवोनि गेलो।।’’ या संतश्रेष्ठ तुकारामांच्या अभंगानुसार झाली आहे.
आजच्या या दरबारी कानडय़ाच्या खर्जाच्या आलापीचा रसास्वाद घेताना हे गुरुपण अगदी स्पष्ट जाणवले. भीमसेनांची, सरगम, गमकची आकारयुक्त आलापी, सौंदर्याने नटलेली.. गंभीर प्रकृतीचा राग आणि आवाजाचा जाड पोत याची मजा वेगळीच! हे सर्व पुनश्च अनुभवास मिळावे हा भाग्याचा क्षण!
‘मैं भरोसे अपने राम के’ ही विलंबित एकतालामधील दरबारी रागामधील ही बंदिश खूप रंगली. ‘झनक झनक बाजे’ ही द्रुत त्रितालामधील बंदिश ही अशीच दाद देऊन गेली. यानंतर ‘फगवा देखनो को चलरी’ ही राग बसंतमधील किराणा घराण्याची मिराशी असलेली बंदिश त्रितालात सुंदर पेश केली. द्रुत एकतालात गेन्डी गेन्डी ही बसंतमधील चीजही रंगली. शेवटी पंढरीचा वास, आरंभी ‘वंदीन राजस सुकमार’ या भजनावलीने सारा शामियाना भक्तिमय वातावरणाने भारून टाकला. पंडितजींना साथ- स्वरसंवादिनी- सुधीर नायक, तबल्यावर ओंकार गुलवाडी, पखवाज- प्रताप पाटील, टाळ- शिरीष जोशी, श्रुतीवर देवव्रत भातखंडे, नागकिरण नायक तर डॉ. राजेंद्र दूरकर हे एकतारीवर.
संपूर्ण स्वर महोत्सवाची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने झाली. सुरेशबाबू माने व विदुषी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून किराणा घराण्याची विधिवत तालीम घेतलेल्या प्रभाजींनी राग संगीतामध्ये सरगमचे महत्त्व हा प्रबंध लिहून विद्यावाचस्पती ही पदवीही मिळविलेली आहे. अनेक ग्रंथांची निर्मिती केली आहे. सुराली, सुस्वराली इ. पद्मभूषण, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कारप्राप्त गुणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा या गायिका आहेत. अशी विद्येची प्रभावळ असलेल्या प्रभाजींनी सर्वप्रथम जोग हा राग सादरीकरणासाठी निवडला. विलंबित एकतालामध्ये ‘जोगिया’ ही बंदिश प्रारंभ केली. अत्यंत संथ, आलाप, बेहेलाव्यांनी, एक एक सुरांनी रागाची बढत होत होती. दोन गंधार व कोमल निषाद लागणारा रेध वर्जस्वर असा हा राग अत्यंत गोड आहे. जोग या नावाप्रमाणे विरक्तीची भावना निर्माण करणारा राग आहे. यातूनच विवेक जागृत व्हावा हा महान उद्देश. अत्यंत शिस्तबद्ध आलाप तानांचे वैविध्यपूर्ण सादरीकरण, रागामधील काव्य शुद्ध उच्चार करीत सौंदर्य या गायिकेने जपले आहे. शास्त्रीय संगीताचा गायक असून बोबडे उच्चार करीत नाही असे सहसा घडत नाही. उच्चारच ऐकू येत नाही म्हटल्यावर अर्थाची वाट लागते आणि सामान्य माणसापासून हे शास्त्रीय संगीत कोसो दूर जाते. या पापाला जबाबदार हे बोबडे नसून बोबडे उच्चार करणारे कुरूप मानसिकता धारण केलेले गायक.
प्रभाताई मात्र आपल्या व्यक्तिगत पातळीवर सुस्पष्ट उच्चार करून बंदिशीचे अर्थाचे सौंदर्य मोठय़ा आस्थेने हे पावित्र्य जपतात हे मुद्दाम नमूद करावेसे वाटले. शेवटी ‘श्यामसुंदर नंदकुवर’ ही झपतालामधील बंदिश भावपूर्ण अंत:करणाने सादर करून हा स्वरयज्ञ शांत झाला. स्वरसंवादिनीवर सुयोग कुंडलकर व तबल्यावर माधव मोडक यांनी साथ केली.