राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं, अशी मी त्यांना विनंती करतो असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालीय ही समाधानाची बाब असली तरी चौथ्या लाटेपासून वाचण्यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
देशात किंवा राज्यात करोनाची चौथी लाट येऊ शकते का असा प्रश्न जालन्यामध्ये पत्रकारांनी राजेश टोपेंना विचारला. यावर उत्तर देताना राजेश टोपेंनी आधी रुग्णसंख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. “सर्वात महत्वाची आणि समाधानाची बाब ही आहे की नवीन केसेसची संख्या कमी झालीय. राज्यामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या २० हजारांच्या खाली गेलीय. एकेकाळी तिसरी लाट एवढी मोठी होती की एकावेळी ४८ हजार रुग्ण आढळत होते. काही लाखांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या होती. या सर्व पार्श्वभूमीवर समाधानाची बाब ही आहे की केसेस कमी झाल्यात आणि लसीकरणाचं प्रमाण खूप चांगलं आहे,” असं टोपे म्हणाले.
“जे काही राहिलेलं लसीकरण आहे त्यांना मनापासून विनंती करायचीय की पूर्ण लसीकरण करुन घ्यावं. बुस्टर डोससाठी जे पात्र आहेत त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, अत्यावश्यक सेवेतील कामगार, पोलिसांनी बुस्टर डोस घेतला पाहिजे. १५ ते १८ वयोगटातील लोकांनाही लसीकरणाचा चांगला प्रतिसाद दिलाय. लसीकरण राहिलेल्यांना मी प्रार्थना करेल की ज्यांची पहिली लस राहिलीय त्यांनी ती नक्की घ्यावी. याचं कारण एकच आहे जर आपल्याला खऱ्या अर्थाने चौथी लाट येऊ द्यायची नसेल, सुरक्षित रहायचा असेल, समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करुन घेणं ही काळाची गरज आहे,” असं राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
“जर आपल्या सर्वांची रोगप्रिताकरशक्ती चांगली असेल. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये फाइट आऊट करण्याची प्रतिबंधात्मक शक्ती असेल तर निश्चित प्रकार चौथ्या लाटेचा आपल्याला कुठल्याही प्रकारे अजिबात धोका असणार नाही,” असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठामपणे सांगितलं.