करोनाचा प्रादुर्भाव आत्ता कुठे कमी होत असल्याची चिन्हे दिसत असतानाच आता ओमिक्रॉन नावाच्या करोनाच्या नव्या रुपाने डोकं वर काढलं आहे. हा विषाणू करोनापेक्षाही अधिक घातक असल्याने सरकारसह सामान्य जनतेचंही धाबं दणाणलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक आज बोलावण्यात होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्क होण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा. लॉकडाउन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.

“कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील”, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. “कुछ नही होता यार” असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. “महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे”, असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you dont want lockdown follow rules said cm uddhav thackeray vsk
First published on: 28-11-2021 at 20:19 IST