महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. आपल्या कमालीच्या निरीक्षण शक्तीने आपली लेखन शैली त्यांनी निर्माण केली. त्यांचं लिखाण त्यांच्या तोंडून ऐकताना किंवा त्यांचं लिखाण वाचताना ते पात्र, तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहातो. पुलंच्या लिखाणाचं हे विशेष आहे. आपल्या लेखनशैलीवर लहानपणी ऐकलेल्या किर्तन शैलीचा प्रभाव आहे. मला किर्तनात जसं पाल्हाळ लावतात ते खूप भावलं. मुद्दा सोडून चाललोय असं वाटत असतानाच लगेच मुद्द्याकडे यायचं असं काहीसं मी माझ्या लिखाणाकडे पाहतो असं पुलंनी म्हटलं होतं. दूरदर्शनची नोकरी मात्र आपल्याला भावली नाही असं पुलंनी सांगितलं.

रेडिओ, टीव्ही या माध्यमांमध्ये पुलंनी काम केलं. मात्र तिथे मन रमलं नाही. कारण तिथे मनोरंजनापेक्षा लोकशिक्षणाचा भाग अधिक होता असं पु.ल. देशपांडे यांनी म्हटलं होतं. अशातच टीव्हीमध्ये काम करत असताना १४ नोव्हेंबरला पंडित नेहरुंना बोलवायचं ठरवलं. त्यांना बोलवलं ते आलेही.. मात्र लाईव्ह कार्यक्रमात ते चिडले. दिवशी काय घडलं होतं? हा किस्सा पु.ल. देशपांडे यांनीच सांगितला होता.

पंडित नेहरुंच्या त्या कार्यक्रमांची संकल्पना काय होती?

“आमच्या टेलिव्हिजन स्टुडिओत एक छोटा हॉल होता. त्यातच सगळे कार्यक्रम व्हायचे. पंडित नेहरुंची मुलाखत त्याच छोट्या हॉलमध्ये घ्यायची असं ठरलं होतं. आधी आम्ही असं ठरवलं होतं की पंडित नेहरुंचा लहान मुलांशी संवाद होईल. पंतप्रधान पंडित नेहरु येतील, ते टेलिव्हिजनच्या हॉलमध्ये बसतील. मुलं ही जणू काही संसदेचे सदस्य आहेत आणि त्यांना प्रश्न विचारत आहेत. त्याला पंडित नेहरु उत्तर देत आहेत. मी प्रश्नही निवडले होते. तुम्ही नेहमी लाल गुलाब का लावता? पिवळ्या गुलाबाने तुमचं काय घोडं मारलं आहे?, तुम्हाला घोड्यावर बसायला आवडतं मग भारतातल्या प्रत्येक शाळेत एक घोडा असला पाहिजे असा आदेश तुम्ही का काढत नाही? अशा प्रकारचे प्रश्न होते. मात्र आमच्या वरिष्ठांना ते काही पटलं नाही. मला त्यांनी सांगितलं सामान्य माणसांशी यांचा (पंडित नेहरु) संवाद ठेवा.” आता त्यावेळी सामान्य माणसं आणायची हे थोडंसं कठीण होतं. कारण आणलेले ते लोक काय बोलतील सांगता येत नव्हतं. त्यावेळी कार्यक्रम रेकॉर्ड करता येत नसे. जो कार्यक्रम होईल त्याचं थेट प्रक्षेपण (LIVE) असे. रेकॉर्डिंग मशीन आलंच नव्हतं. त्यामुळे लाईव्ह करताना काळजी घ्यावी लागत असे.”

P L Deshpande Birth Anniversary
पु. ल. देशपांडे यांनी सांगितलेला किस्सा नेमका काय? (फोटो सौजन्य-X)

सामान्य माणसं आणली त्यांच्या प्रश्नांमुळे वातावरण तापलं होतं-पुलं

“मी वरिष्ठांना सांगितलं की असं कॉमन लोकांना आणून बसवणं रिस्की आहे. पण त्यांनी सांगितलं नाही तुम्ही हे कराच. मग मलाही राग आला होता. मी गेलो आणि काही सामान्य माणसं खरंच आणून बसवली. त्यात एक रिक्षावाला होता, एक असा माणूस होता ज्याला पाहिल्याबरोबरच भीती वाटावी. असे लोक मी आणून बसवले आणि त्यांना प्रश्न विचारायचे आहेत हे कार्यक्रमाचं स्वरुप सांगितलं. ठरल्याप्रमाणे त्यादिवशी पंडित नेहरु आले. त्यांनी स्टुडिओत ही सगळी माणसं बसलेली पाहिली तेव्हा मला म्हणाले ये सभी उंची उमर के दिखायी दे रहें है… त्यावेळी मी त्यांना म्हटलं ये भी एक जमाने में बच्चे थे. You Are Very Clever Young Man असं पंडित नेहरु म्हणाले आणि चांगल्या मूडमध्ये मुलाखतीसाठी बसले. तिथे रिक्षावाल्याने त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की पंडितजी हमारे स्लम जलानेवाले हैं और वहां इमारत खडी करने वाले हैं. पंडित नेहरुंना पहिलाच प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे जा. त्यावर रिक्षावाला म्हणाला वो लोग कह रहें है आपके पास जाओ, आप कह रहे हैं उनके पास जाओ. हमको सभी थप्पड लगाते है..मला मनात वाटलं झालं पंडित नेहरु आता चिडले. बरं हे सगळं लाईव्ह सुरु होतं प्रसारित होत होतं. हे सगळं कमी काय म्हणून त्यांना (पंडित नेहरु) यांना आणखी प्रश्न आला दिल्लीमें अठ्ठनी वाले स्कूल भी हैं और ५०० रुपयेवाले स्कूल भी है..हमारे बच्चे कितने दिन अठ्ठनी वाले स्कूलमें जायेंगे? या प्रश्नानंतर वातावरण तापू लागलं.

फ्लोअर मॅनेजरकडून पाठवलेली चिठ्ठी आणि..

त्यावेळी मी फ्लोअर मॅनेजरकडून त्यांच्यात एक वृद्ध गृहस्थ होते त्यांना चिठ्ठी पाठवली. त्या चिठ्ठीत प्रश्न लिहून पाठवला होता, ‘पंडितजी तुम्ही देशाची एवढी जबाबदारी घेता, इतकं काम करता तरीही तुमचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा फुललेला कसा राहतो?’ या प्रश्नानंतर पंडित नेहरु जरा शांत झाले. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी खूप छान दिलं होतं. पंडित नेहरु म्हणाले होते, मी पार्लमेंट पार्लमेंटमध्येच ठेवून येतो.. ते घरी आणत नाही. सकाळी बागेतून फिरून येतो. लहान मुलांबरोबर वेळ घालवतो. तसंच महिन्या-दोन महिन्यांतून एखाद्या डोंगरावर जाऊन येतो आणि आजूबाजूच्या प्रदेशाचं दर्शन घेत असतो. हे मला तरुण ठेवत असतं. या नोटवर तो कार्यक्रम आम्ही संपवला. नाहीतर पंचाईत आली असती भांडणं झाली असती. हा प्रसंग घडला तरीही मुलाखत घेत असताना ज्याची मुलाखत घेतली जाते त्याला टॉपल करणं महत्त्वाचं आहे. थोडा भडका उडाला की तो माणूस खरी उत्तरं द्यायला लागतो.” असा किस्सा पुलंनी सह्याद्री वाहिनीच्या मुलाखतीत सांगितला होता.

टेलिव्हिजनची नोकरी का सोडली?

टेलिव्हिजनची नोकरी सोडली कारण तिथे मनोरंजन कमी आणि लोकशिक्षण जास्त होता. मला त्याचा कंटाळा येऊ लागला. कारण नाईलाज म्हणून आम्ही मनोरंजन करतो आहोत अशी भूमिका मला दिसू लागली होती. मला उत्तम नर्तन, उत्तम गाणं हे उत्तम शिक्षण आहे असंच वाटतं. आपण संस्कृतीच्या गोष्टी करतो.. दुसऱ्याला आनंद देणं हीच संस्कृती आहे. माझं मन तिथे रमलं नाही म्हणून मी ते काम सोडलं असं पुलंनी सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज आपल्या लाडक्या पुलंची जयंती. त्यांच्या नावापुढे अनेक बिरुदं लागली. कोट्यधीश पुलं, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व, भाई, भाई काका फक्त एकच बिरुद आपल्या सगळ्यांना नकोसं वाटलं ते म्हणजे कैलासवासी पुलं. आज ते आपल्यात नसले तरीही त्यांचं लिखाण आहे..त्यांनी सांगितलेल्या कथा ऑडिओ आणि व्हिडीओ रुपात आहेत. माझं साहित्य एखाद्या तरुणाने वाचलं तर मी आणखी पन्नास वर्षे जगलो असं मला वाटतं असं पुलं एकदा म्हणाले होते. तसंच आहे.. पुलं शरीराने आपल्यात नाहीत.. मात्र त्यांचा साहित्यरुपी सहवास आपल्या मनात कायम दरवळतो आहे यात शंकाच नाही.