जालना : जालना शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह सत्ताधारी आणि विरोधकही आक्रमक झाले आहेत. जुना जालना भागातील शंकरनगर, संजयनगर, मिल्लतनगर, नीळकंठनगर इत्यादी ठिकाणच्या नागरिकांनी विजेच्या प्रश्नावर महावितरणच्या मस्तगड येथील कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार दिवसा आणि रात्रीही वीजपुरवठा खंडित होत असून संबंधित यंत्रणा यासंदर्भातील तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे करणराजे जाधव यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या मोर्चात नागरिकांनी सांगितले.
सातत्याने जालना शहर आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली ‘महावितरण’ च्या कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालण्यात आला. रोहित्र वेळेवर दुरुस्त केले जात नाही, कंत्राटदारांना हाताशी धरून बोगस बिले काढली जातात, कामगारांना आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही इत्यादी तक्रारी अंबेकर यांनी यावेळी केल्या.
वीज खंडित होण्याच्या जालना शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या तक्रारींमुळे शिवेसेनेचे (शिंदे) आमदार अर्जुन खोतकर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात पदाधिकायांसह जाऊन जाब विचारला. वीज पुरवठा खंडित होण्याच्या नागरिकांच्या तक्रारी अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या. महावितरणच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक सूचना केल्या. लोंबकळणाऱ्या धोकादायक तारा, उघडी रोहित्रे, भरमसाठ वीजबिले त्याचप्रमाणे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे इत्यादींकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचनाही खोतकर यांनी यावेळी केली.