राज्य शासनाकडून १५७.५० कोटींचा आराखडा मंजूर

पालघर : पालघर जिल्ह्यासाठी ३१.५८ कोटी रुपयांचा वाढीव निधी राज्य शासनाने मंजूर केला असून २०२०-२१ या वर्षांसाठी १५७.५० कोटी रुपयांचा नियतव्ययाचा अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांमध्ये राबवावयाच्या विविध योजना व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय याबाबतचे एक सविस्तर सादरीकरण २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केले. २०२०-२१ या वित्तीय वर्षांसाठी त्यांनी १२,५९२ लाख रुपयांच्या आराखडय़ाचे सादरीकरण केले. यामध्ये पाच टक्के निधी ६२९.६० लाख रुपये नावीन्यपूर्ण आणि इतर योजनांसाठी, उर्वरित ९५ टक्के निधीच्या २/३ निधी ७९७४.९३ लाख रुपये गाभा क्षेत्रातील विविध योजनांसाठी, तर १/३ निधी ३९८७.४७ लाख रुपये बिगरगाभा क्षेत्रातील विविध योजनांसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ग्रामविकास, परिवहन, शिक्षण, आरोग्य, नगरविकास, बंदरे विकास व पर्यटन इत्यादी विविध क्षेत्रांसाठी १६,९०२ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली. मात्र महत्त्वाच्या योजनांसाठी ५,४५८ लाख रुपये अतिरिक्त आग्रहाची मागणी राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आली. राज्यस्तरीय बैठकीत ३,१५८ लाख रुपये वाढीव निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. यापैकी ७५० लक्ष नियतव्यय जिल्ह्यातीलतील विक्रमगड, जव्हार व वाडा येथील प्रशासकीय इमारतीकरिता प्रत्येकी २५० लाख रुपयांची तरतूद करावी आणि २०२१-२२ करिता ७५० लाख रुपये प्रशासकीय इमारतीकरिता देण्यात येतील, ही सर्व कामे दोन वर्षांत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश राज्याच्या अर्थमंत्र्यांनी दिले.

खर्च प्रस्तावित (रुपयांमध्ये)

  •  गाभा क्षेत्रातील कृषी क्षेत्रासाठी – १६९५.९९ लाख
  •  ग्रामविकास क्षेत्रासाठी- १४००.०१ लाख
  • पाटबंधारे व पूरनियंत्रण क्षेत्रासाठी – १७७६.१० लाख
  •  सामाजिक व सामूहिक सेवा क्षेत्रासाठी – ३१०२.८३ लाख
  •  बिगरगाभा क्षेत्रातील ऊर्जा क्षेत्रासाठी – ७९० लाख
  •  उद्योग क्षेत्रासाठी – ५५ लाख
  •  परिवहन क्षेत्रासाठी – १२८०.०१ लाख
  • सामान्य आर्थिक सेवांसाठी – ९६२.४६ लाख
  •  सामान्य सेवांसाठी – ९०० लाख