महाराष्ट्रात बेरोजगारी आहे, स्त्रियांचे प्रश्न आहेत, उद्योग येत नाहीत. मात्र आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे काहीही ऐकू येत नाही त्यांना फक्त दिल्लीत गेल्यावर आपल्या हिताचं ऐकू येतं असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. एवढंच नाही तर गुंतवणूकदार महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाहीत कारण राज्यात एक सीएम आणि दुसरे स्पेशल सीएम आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. अनेक MoU या सरकारने थांबवले आहेत महाराष्ट्रात एकही उद्योग गेल्या सहा महिन्यात आलेला नाही. अनेक MoU थांबवून ठेवले आहेत. दाव्होस या ठिकाणी जाण्याची त्यांची तयारी सुरू आहे. हे MoU त्याचसाठी थांबवण्यात आले आहेत. तिकडे जाऊन त्यावर सह्या करायच्या आणि तिथून काहीतरी गुंतवणूक आली आहे हे दाखवायचं. जीडीपी घसरला आहे याबाबत विचारलं असता ते म्हणाले की सहा महिन्यांपूर्वी केळ्याची साल कुणी टाकली तुम्हाला माहित आहेच. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कुणीच उत्सक नाही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कुणीही उत्सुक नाही कारण राज्यात एक सीएम आणि एक स्पेशल सीएम आहेत. चौकशा लावणं, ईडीकडून त्रास देणं, जाणीवपूर्वक टार्गेट करणं हे सगळे प्रकार सुरू असल्याने कोण गुंतवणूक करणार? हे सरकार लवकरच पडणार आहे. पण पुढचं सरकार येईल ते महाराष्ट्राच्या हिताचं असलं पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फक्त दिल्लीचं ऐकतात बाकी कुणाचं काहीही ऐकत नाही. एकनाथ शिंदे यांनी २१ जूनला शिवसेनेच्या नेतृत्त्वाविरोधात म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं. त्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने कोसळलं. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उभी फूट पडली आहे. शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेल्याने दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आदित्य ठाकरेंकडून सातत्याने या सगळ्यांचा उल्लेख गद्दार असा केला जातो आहे. आजही त्यांनी इतर राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले मात्र आपले मुख्यमंत्री दिल्लीत जातात आणि स्वतःच्या हिताचं ऐकतात. जनतेच्या हिताशी त्यांना काही घेणंदेणं नाही असाही आरोप केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्याबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे? मुंबईत कालच योगीजी येऊन गेले.. नीट ऐका हां मी योगीजी म्हटलं आहे औरंगजेबजी नाही ते त्यांचे लोक म्हणतात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी चंद्रशेखर बावनकुळेंनाही टोला लगावला. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह चौहान येऊन गेले. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यांची काळजी आहे. त्यामुळे गुंतवणूक काय कशी करता येईल याचे मार्ग ते शोधत असतात. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातात तेव्हा त्यांना फक्त स्वतःचं हित काय आहे तेवढंच ऐकू येतं जनतेच्या प्रश्नाशी त्यांना घेणंदेणं नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.