अमरावती : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) आयोजित एमपीएससी प्रशिक्षण पूर्वपरीक्षेत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्याने महाज्योतीने प्रवेश परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा कार्यादेश रद्द केला आहे. महाज्योतीने यूपीएससी तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी एका परीक्षा संस्थेद्वारे १६ ते ३० जुलैपर्यंत राज्यातीन विविध केंद्रांवर प्रवेश परीक्षा आयोजित केली होती.
यूपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये काही परीक्षार्थीनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. याबाबत व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता. तसेच एमपीएससी प्रशिक्षण प्रवेश परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गमित झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या हेतूने ३० जुलै रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेदरम्यानदेखील विशिष्ट प्रशिक्षण संस्थेतील सराव प्रश्नपत्रिकामधील मोठय़ा प्रमाणावर प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या.
त्याचीदेखील चौकशी करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक यांनी मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना केली होती. याबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेला याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते. परीक्षा संस्थेकडून महाज्योतीच्या चौकशी अधिकाऱ्यांना खुलासा सादर केला आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्या संदर्भातील अहवाल व्यवस्थापकीय संचालक यांना सादर केला. यानुसार, परीक्षा घेणाऱ्या संस्थेने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सामंजस्य करारातील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी परीक्षा संस्थेचा कार्यादेश रद्द करण्याचे आदेश ३ ऑगस्ट रोजी दिले.
नवे वेळापत्रक लवकरच ..
यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेतलेल्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून त्यासाठी अन्य यंत्रणेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात येणार आहे, असे महाज्योतीद्वारे कळवण्यात आले आहे.