शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला. निवडणूक आयोगासमोर याबाबतची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचं ट्विटर) अजित पवारांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अजित पवार शिवसेना फुटीवर भाष्य करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी नवीन पक्ष काढावा, असा सल्ला अजित पवार देताना दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना नवीन पक्ष आणि चिन्ह घेऊन कर्तृत्व सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. अजित पवारांना उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, “दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आला आहात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना आपण एक सल्ला दिला होता. त्या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल.”

हेही वाचा- “भगीरथ बियाणींच्या मुलीला कुणी छळलं?”, अजित पवारांवर टीका करताना आव्हाडांचा गौप्यस्फोट

“कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांनी जन्म दिला आहे. त्याचं पालनपोषण शरद पवारांनीच केलं. त्याचं संगोपनही पुढे शरद पवारांनीच केलं. शरद पवारांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात वाढला. मग, जसं आपण म्हटलात तसं निर्णय घ्या आणि एक नवीन पक्ष काढा, नवीन चिन्ह घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करुन दाखवा,” असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना फुटीवर अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेल्या भाषणात अजित पवार म्हणाले होते की, तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष… तुम्हाला कुणी आडवलं होतं. ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला. ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला. शिवाजी पार्कला काढलेला पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच (उद्धव ठाकरे) पक्ष काढून घेतला. त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगानं दिलं असलं तरी जनतेला पटलंय का? त्याचाही विचार झाला पाहिजे.