कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन शहिदांच्या कुटुंबाची उपेक्षा थांबवून त्यांच्या मातापित्यांना नियमानुसार देय असलेली जमीन तातडीने देण्यात यावी, अशी मागणी आ. जयंत जाधव यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली आहे. कारगिल युद्धात ६ जून १९९९ रोजी सुरेश विष्णू सोनवणे (रा. काजीसांगवी, ता. चांदवड) आणि एकनाथ चैत्राम खैरनार (रा. देवघट, ता. मालेगाव) या नाशिक जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आले. या दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम होती. या कुटुंबीयांना शासकीय मदतीचा हात मिळाला, परंतु लष्करी सेवेत असताना वीरमरण आल्यानंतर शासनाकडून जमीन दिली जाते. या कुटुंबीयांना अद्याप जमीन देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने वाऱ्यावर सोडल्याची या कुटुंबामध्ये भावना निर्माण झाली आहे. तरी शहीद कुटुंबीयांची उपेक्षा थांबविण्यासाठी नियमानुसार देय असलेली जमीन देण्यात यावी, अशी मागणी आ. जाधव यांनी केली आहे.