ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. डॉ. लागू नास्तिक असल्यामुळे कोणतेही धार्मिक विधी यावेळी झाले नाहीत. तत्पूर्वी बालंगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मंगळवारी वयाच्या ९२व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

अंत्यसंस्कारापूर्वी सकाळी १० वाजता येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात डॉ. लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह डॉ. लागू यांच्या चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्याच्या पत्नी डॉ. दीपा लागू, पुत्र डॉ. आनंद लागू, बंधू विजय लागू यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी देखील यावेळी लागू यांचे अंत्यदर्शन घेतले.

डॉ. लागू यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणल्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून डॉ. लागू यांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, सह-पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पुणे शहरचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) अमृत नाटेकर, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, नाना पाटेकर, विजय केंकरे, राहुल सोलापूरकर, माधव वझे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर,  चंद्रकांत कुलकर्णी , नंदू माधव, सुधीर गाडगीळ, प्रसाद कांबळी, मेघराज भोसले, सुनील महाजन, पर्ण पेठे, ज्योती सुभाष, विवेक लागू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाने त्यांना ओळख दिली. रंगभूमीवर एक काळ गाजविलेल्या परंतु वृद्धावस्थेत फरफट झालेल्या अप्पासाहेब बेलवलकर या अभिनेत्याची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली होती. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट असाच त्यांचा परिचय झाला. या भूमिकेचे गारुड रसिकांबरोबरच रंगभूमीवरील अनेक कलाकारांवर होते. लागू यांनी अजरामर केलेली ही भूमिका नंतरच्या काळात दत्ता भट, सतीश दुभाषी, यशवंत दत्त, डॉ. लक्ष्मणराव देशपांडे, राजा गोसावी, उपेंद्र दाते यांनी साकारली. ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘जगन्नाथाचा रथ’, ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र, ‘आधे अधुरे’, ‘गाबरे’, ‘कन्यादान’, ‘सुंदर मी होणार’ आणि ‘मित्र’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. मकरंद साठे यांनी लिहिलेले ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे त्यांचे रंगभूमीवरचे अखेरचे नाटक ठरले.

व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटाद्वारे त्यांचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले. एका आदर्श मास्तराच्या आयुष्याचा तमाशा कलावंतीणीमुळे होणारा प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे रेखाटला होता. ‘सिंहासन’, ‘सामना’ आणि ‘मुक्ता’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

मराठीप्रमाणेच डॉ. लागू यांनी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘इन्कार’, ‘घरोंदा’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसह विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांचा ठसा उमटविला होता. ‘अनकही’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला समीक्षकांनी वाखाणले होते.
डॉ. लागू यांचा तरुण मुलगा तन्वीर याला रेल्वेतून प्रवास करताना बाहेरून फेकण्यात आलेल्या दगडामुळे मोठी दुखापत झाली आणि त्यातच त्याचे निधन झाले. त्याची स्मृती जपण्यासाठी त्यांनी तन्वीर सन्मान देण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ९ डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना हा तन्वीर सन्मान प्रदान करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर त्यांचे पुत्र आनंद अमेरिकेला गेले होते ते परतल्यानंतर शुक्रवारी (२० डिसेंबर) डॉ. लागू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भूमिकेवर ठाम

‘देवाला रिटायर करा’ या डॉ. लागू यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. त्यांच्यावर टीकेचा भडिमारही झाला. परंतू डॉ. लागू यांनी आपली भूमिका बदलली नाही. आयुष्यभर ते या भूमिकेचा पुनरुच्चार करीत राहिले.