लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे तुळशीराम तांडा जवळील पाझर तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. ऊसतोड कामासाठी पालम येथील या महिला अहमदपूर तालुक्यात काही दिवसापासून कार्यरत होत्या. आज सकाळी दोन महिला व तीन मुली कपडे धुण्यासाठी पाझर तलावावर गेल्या होत्या.

यापैकी एका महिलेचा तोल गेल्याने ती पाण्यात पडली व बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी एकामागोमाग एक चौघीजणीही पाण्यात गेल्या मात्र दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाचही जणी पाण्यात बुडून मरण पावल्या.
 मृत पावलेल्यांमध्ये आई व दोन मुली एकाच घरातील आहेत. राधाबाई धोंडीबा आडे (वय 45, रा. रामपूर तांडा तालुका पालम), दीक्षा धोंडिबा आडे (18) आणि काजल धोंडीबा आडे (18) या मायलेकीसह, सुषमा संजय राठोड (वय 21), अरुणा गंगाधर राठोड (वय 19 रा. दोघीही मोजमाबाद तांडा ता. पालम) या पाच जणींचा मृत्यू झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षक राकेश जाधव व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकरामचंद्र गोखले हे घटनेचा अधिक तपास करत आहेत. पाचही जणींचे मृतदेह बाहेर काढून त्याची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांकडे सोपवण्याची कारवाई सुरू होती.