राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आज लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच माध्यमांशी बोलताना लॉकडाउन वाढवण्यात आल्यासंबंधी अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असं सांगितलं होतं. त्यानंतर आज १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्यानेच कठोर निर्बंध ३१ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यावरून आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“ मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, शरद पवारांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली.” असं केशव उपाध्येंनी ट्विट केलं आहे.

याचबरोबर “लॉकडाउन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्यमाणसा, नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूच आहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा.” असं देखील उपाध्ये म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारकडून निर्बंध जाहीर

ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीआसीरआर टेस्ट रिपोर्ट असं बंधनकारक असून प्रवेश कऱण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असं आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.

शरद पवारांनी पाठवलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले..

तर काही दिवस अगोदर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पत्र पाठवले होते. तसेच, आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे. असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला होता. यावरूनही केशव उपाध्येंनी टिप्पणी केल्याचं दिसून येत आहे.