मंदार लोहोकरे

पंढरपूर : बहुचर्चित माढा लोकसभेची लढाई भाजप आणि मोहिते पाटील या दोघांच्या प्रतिष्ठेची झाली आहे, मोहिते पाटील घराण्याचे तर आगामी राजकारणाची दिशाच या निकालानंतर ठरण्याची शक्यता आहे. राजकारणाचा बदललेला पट, त्यातील गटतट, जातींचे राजकारण, धनगर-ओबीसींच्या मतांबाबत प्रथमच न येणारा अंदाज हे सर्व मुद्दे माढ्यात महत्वाचे ठरणार आहेत.

माढ्यात भाजपने यंदा विद्यामान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी कायम ठेवली. आणि त्याच कारणाने मोहिते पाटलांनी भाजपमध्ये बंड करत पवार गटाचा रस्ता पुन्हा पकडला. या मतदारसंघात महायुतीच्या पाठीशी पाच आमदार आहेत, हे सर्व आमदार त्यांच्या मतदारसंघात मातब्बर आहेत. तर मोहिते पाटील यांच्याकडे त्यांची स्वताची ताकद आणि निंबाळकरविरोधी नाराज रामराजे गटाचा पाठिंबा दिसत आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांबद्दल तयार झालेली सहानुभूती देखील त्यांना येऊन मिळालेली दिसत आहे. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटलेली निवडणूक पुढे चुरशीची बनली.

माढा लोकसभेची जागा आजपर्यंत प्रत्येक वेळी चर्चेचा विषय ठरली आहे. यंदाही भाजप आणि ऐनवेळी भाजपमधून बाहेर पडत पवार गटात सामील झालेले बंडखोर उमेदवार अशी लढत होत असल्याने ती राज्यात लक्षवेधी होत आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली. माण-खटाव, फलटण येथील पाण्याचा प्रश्न, सांगोला येथील पाण्याचा प्रश्न, पालखी मार्ग, लोणंदझ्रपंढरपूर रेल्वे मार्ग अशी अनेक विकासकामे केल्याचा दावा निंबाळकर आणि भाजपने केला. दुसरीकडे भाजपमधीलच धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत बंड केले. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असल्याने ते देखील उमेदवाराच्या शोधात असताना पवारांना मोहिते पाटलांचा पर्याय ऐनवेळी उपलब्ध झाला. पवारांनीही त्यांच्याच खांद्यावर झेंडा दिल्याने एकप्रकारे माढ्यात भाजपअंतर्गतच लढाई सुरू झाली. यामुळे पवारांवर नाराज होत बाहेर पडलेले मोहिते पाटील कुटुंब पुन्हा एकदा पवार गटात सामील झाले.

या मतदारसंघात धनगर समाज जवळपास साडेचार लाख, माळी समाज हा अडीच लाख मतदार संख्येने आहे. आरक्षणाच्या मद्द्यावर हा सर्व समाज कुठल्या दिशेने जाईल यावर अनेक गणिते अवलंबून आहेत. हा सर्व समाज गेल्या काही वर्षांपासून भाजपकडे झुकलेला आहे. यंदा ही मते कुठे जाणार यावरही माढ्याचा निकाल अवलंबून आहे.

हेही वाचा >>>सांगली: पाण्यासाठी तासगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक, पोलीसांशी झटापट

‘कसब्या’ची पुनरावृत्ती की पराभवाचा वचपा?

अविनाश कवठेकर

पुणे : लोकसभेची निवडणूक असूनही प्रचारात स्थानिक प्रश्नांनाच प्राधान्य राहिलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत वाढलेला मतटक्का चर्चेचा झाला आहे. कसबा, कोथरूड, पर्वतीसह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील कोणाला मताधिक्य मिळणार, यावरच विजयाचे समीकरण अवलंबून राहणार आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे आणि एमआयएमकडून अनिस सुंडके निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र मोहोळ आणि धंगेकर यांच्यातच लढत झाली. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य देण्यात आले. भाजपच्या महापालिकेतील सत्ताकाळातील गैरव्यवहार आणि शहराचा खुंटलेल्या विकासाचा मुद्दा काँग्रेसने पुढे आणला. तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन भाजपने केले.

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या निवडणुकीपेक्षा ३.७ टक्के अधिक मतदान झाले आहे. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्यामुळे हा परिणाम भाजपविरोधातील सुप्त लाटेचा की, भाजपच्या लाटेचा आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात तब्बल ५९.२४ टक्के मतदान झाले आहे. या परिस्थितीत भाजपला गेल्या निवडणुकीसारखी आघाडी मिळणार, की धंगेकरांनी वर्षभरापूर्वी झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत दाखवलेला चमत्कार पुन्हा दिसणार, याबाबतची चर्चा आहे. कसब्याप्रमाणेच कोथरूड विधानसभा मतदारसंघही भाजपचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कोथरूडमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीही ताकद असून या पक्षाने एकदिलाने धंगेकर यांचे काम केल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला किती मताधिक्य मिळणार, यावरच विजयाचे समीकरण निश्चित होणार आहे. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदार असलेला वडगावशेरी विधानसभा मतदारसंघही निर्णायक ठरणार आहे.

सातारा कुणाचा बालेकिल्ला?

विश्वास पवार

वाई : साताऱ्यात एका बाजूला उदयनराजे हरणार की जिंकणार याची उत्सुकता, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा १९९९ पासूनचा बालेकिल्ला टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शशिकांत शिंदेंसमोर आहे.

राज्यात सातारा मतदारसंघ जागा वाटपात सर्वात शेवटी निश्चित झाला. महायुती आणि महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ नेमका कोण पक्ष लढवणार आणि त्यानंतर कोण उमेदवार असणार यावर अनेक दिवस खल झाला. अखेर यानंतर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले, तर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून शशिकांत शिंदे आमने-सामने उभे ठाकले.

सरळ लढत झाल्याने येथे मतांची विभागणी टळली आहे. उदयनराजे यांनी यापूर्वी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. यंदाही महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची एकत्रित ताकद पाहिल्यावर उदयनराजेंची कागदावरची शक्ती ही मोठी दिसत आहे. शिवाय नरेंद्र मोदींचे राष्ट्रीय वलय, त्यांनी उदयनराजे यांच्यासाठी घेतलेली सभा या गोष्टीही त्यांच्या बाजूने ठरल्या. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला उदयनराजे यांनी दिलेली साथ त्याच्या कशी मदतीला येते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पाटणचे आमदार पालकमंत्री शंभूराज देसाई, वाईचे आमदार मकरंद पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे या महायुतीच्या चार आमदारांनी उदयनराजेंसाठी मेहनत घेतली. त्यांच्या मतदारसंघातील मतदान हे उदयनराजेंची जमेची बाजू ठरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वत:चा असा मतदार या जिल्ह्यात आणि महाबळेश्वर तालुक्यात आहे, त्यांची मदत उदयनराजेंना झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. जिल्ह्यात पूर्वी राष्ट्रवादीचा संस्थात्मक राजकारणापासून गाव भागापर्यंत प्रभाव होता. त्यामध्ये आता फूट पडली आहे. मात्र पवारांचे वलय, त्यांना मानणारा वर्ग हा काय करेल यावरच शिंदे आणि उदयनराजे यांचे भवितव्य अवलंबून आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई बाजार समिती गैरव्यवहारांचे बालट आले. निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा जोरदार चर्चेत आला. शिंदे यांना त्याचा किती फटका बसतो हेही पाहावे लागेल.

दोघांकडून विजयाचा दावा केला जात आहे. कार्यकर्ते आपलाच उमेदवार किती मतांनी विजयी होणार त्याच्या आकडेवारीमध्ये सध्या मग्न आहेत. शहरी – ग्रामीण मतदारांचा यंदा मतदान करताना विचारही वेगळा होता. मोदी सरकारबद्दल शहरी मतदार समाधानी असताना शेती मालाचे भाव, बेरोजगारीने ग्रामीण मतदार अस्वस्थ होता. या साऱ्यांचे प्रतिबिंब मतदानावर कसे पडते हेही पाहावे लागेल.

हेही वाचा >>>“शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!” माजी आरोग्य अधिकाऱ्याचं पत्र शेअर करत वडेट्टीवारांचा हल्लाबोल

‘बारामती’चा निकाल खडकवासला, पुरंदरच्या हाती?

सुजित तांबडे

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील लढत पवार कुटुंबीयांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनली असताना, मतटक्का घटल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील धाकधूक वाढली आहे. विशेषत: खडकवासला आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघांतील घटलेले मतदान हे निकालाला कलाटणी देणारे ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या मतदारसंघात चुरशीची लढत असल्याने मतदानाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, या वेळी अवघ्या ५६.९७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सन २०१९ मध्ये ६१.७० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे घटलेले पाच टक्के मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

नणंद-भावजयीमधील या लढतीमुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अग्रेसर होता. त्यांना भाजप, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांची साथ होती. त्यांच्याकडून विकासाचा मुद्दा घेऊन प्रामुख्याने खडकवासला मतदारसंघाकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या घटक पक्षांची बैठक घेऊन नियोजन आखले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही भावनिक मुद्द्यांवर जोर देत मतदारांना आवाहन केले होते. सुळे यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा केला नव्हता. मागील दोन निवडणुकांमध्ये खडकवासल्याची साथ मिळत नसल्याने सुळे यांनीही खडकवासलामध्ये संपर्कावर भर दिला होता. खडकवासला विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत भाजपचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला मताधिक्य मिळत आले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची मदार खडकवासलावर आहे. मात्र, यंदा या मतदारसंघात जेमतेम ५० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुरुवातीला अजित पवार यांच्याविरुद्ध घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे निवडणुकीच्या काळात पुरंदर मतदारसंघ चर्चेत आला होता. अवघे ४१ टक्के मतदान झाल्यामुळे हे मतदार कोणाच्या बाजूने जाणार, यावर निकाल अवलंबून आहे. खडकवासला आणि पुरंदरमधील घटलेला मतटक्का कोणाला अडचणीत ठरणार, याबाबत उत्सुुकता निर्माण झाली आहे.