जातनिहाय याद्यांचे समाजमाध्यमांवर पेव; सनदी अधिकाऱ्यांमध्ये नाराजी सौरभ कु लश्रेष्ठ, लोकसत्ता मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी यशस्वी ठरल्याचा आनंद साजरा होत असताना या भावी अधिकाऱ्यांच्या अभिनंदन संदेशात ‘पाहिजे जातीचे’ असा सूर दिसत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. विविध संस्था, ज्ञातीसंघटनांनी यूपीएससी यशवंतांचे अभिनंदन करताना आपल्या जातीच्या उमेदवारांच्या याद्या झळकवणे हा घातक प्रकार असल्याचा धोक्याचा इशारा आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी लागल्यानंतर त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक उमेदवार यशस्वी ठरल्याचे दिसून आले. आतापर्यंत असा निकाल लागल्यावर त्या विद्यार्थ्यांचा गौरव होताना त्यांनी के लेले कष्ट, घरची प्रतिकू ल परिस्थिती व त्यावर के लेली मात अशा पातळीवर चर्चा व्हायची. त्यातून भविष्यात आपणही प्रयत्न व कष्ट करून यश मिळवू शकतो, हा संदेश तरुण-तरुणींपर्यंत जायचा. त्या-त्या भागातील संस्था जातीपातीच्या पलीकडे जाऊन यशवंत उमेदवारांचे अभिनंदन, गौरव करायचे. मात्र, यंदा यशस्वी उमेदवारांच्या जातनिहाय याद्या तयार करून त्या जातीच्या संघटना, संस्थांनी केवळ ‘आपल्या’ उमेदवारांचे अभिनंदन केल्याचे चित्र समाजमाध्यमांवर दिसले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांपैकी ब्राह्मण विद्यार्थ्यांची नावे निवडून त्यांची यादी जाहीर करत अभिनंदन केले. मराठा व कु णबी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्थापन झालेल्या सारथी या संस्थेने मराठा व कु णबी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करत त्यांचे अभिनंदन के ले. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने इतर मागासवर्गातील व त्यातही विशिष्ट जातीच्या यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर करत त्यांचे अभिनंदन के ले. नंतर मात्र त्यांनी समाजमाध्यमांवरील तो मजकू र हटवला. त्यातही गंमत म्हणजे काही उमेदवारांची नावे सारथीच्या व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अशा दोन्ही यादीत होती. आडनावांवरून जात ठरवताना यादी तयार करणाऱ्यांची गफलत झाल्याने तो प्रकार घडला. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भावी अधिकाऱ्यांचे असे जातनिहाय अभिनंदन करण्याचा प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये उमटली आहे. जात-जिल्हा, राज्य अशा सीमा ओलांडून राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांमध्ये काम करणाऱ्या भावी अधिकाऱ्यांचे असे जातिनिहाय कप्पे पाडणे हा संकु चित विचार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यात अडकू नये, दुर्लक्ष करावे. अशी जातीय ओळख तयार होणे हे त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठीही अडचणीचे ठरू शकते. त्यांच्याकडे पाहण्याचा संबंधितांचा दृष्टिकोन बदलू शकतो, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्यांचे अभिनंदन करताना जातीचा विचार करून यादी तयार करण्याचे कृत्य हे केवळ वाईट नसून, समाज म्हणून झालेल्या आपल्या घसरणीचे लक्षण आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय पातळीवर अधिकारी म्हणून काम करताना जात-प्रदेश अशा गोष्टी बाजूला ठेवून जबाबदारी पार पाडण्याची अपेक्षा असते. वैयक्तिक-सामाजिक व्यवहारांत जातीपातीच्या पलीकडे जाणाऱ्या नव्या पिढीमध्ये जातीपातीचा संकु चित विचार रुजण्याचा यात धोका आहे. - माधव गोडबोले, माजी केंद्रीय गृहसचिव