Maharashtra Political Crisis Updates, Eknath Shinde Oath Ceremony : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर बुधवारी (२९ जून) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज (३० जून) बहुमताच्या चाचणीसाठी बोलावलेलं विशेष अधिवेशन रद्द केलं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी घोषित केले आहे. भाजपा एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले जाणार आहे. भाजपाने शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रत्येक वेगवान घडामोडीची लाईव्ह अपडेट…
Maharashtra Political Crisis Live : एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा; वाचा प्रत्येक अपडेट…
शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!"
अगोदर बंड झाले होते, तेव्हा एवढी गडबड नव्हती झाली. एक दिवस आम्ही लोकांनी ठवरलं आणि वसंतदादांना आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर जात आहोत असं सांगितलं. ते झाल्यानंतर वसंतदादांनी राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा शिवसेनेला संपवण्यात काही संबंध नाही. त्यांच्याकडे सध्या बहुमत आहे. त्यामुळे बहुमत आहे, हे लक्षात आलं तर जास्त कटकटी करु नये. बहुमत गेले हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. माझ्या दृष्टीने ते चांगलं आहे. १९८० मध्ये माझ्या नेतृत्वात ७९ आमदार निवडून आले. निवडणूक झाल्यावर मी भारताच्या बाहेर सुट्टीला गेलो. परत आल्यानंतर माझ्यासह फक्त सहा लोक शिल्लक राहिले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो. माझं पदही गेलं. पण नंतर निवडणूक झाली आणि जे मला सोडून गेले त्यांचा जवळपास सगळ्याचा पराभव झाला.
देवेंद्र फडणवीस यांनी नंबर दोनची जागा फडणवीस यांनी आनंदाने स्वीकारली असे दिसत नाही. त्यांचा चेहरा सांगत होता. पण ते नाखूश आहेत. त्यांनी नागपूरमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. आदेश आल्यावर तो पाळायचा असतो, असे संस्कार त्यांच्यावर झाले असावेत, बाकी काही कारण असू शकत नाही.
मी बंड थोपवण्यासाठी चर्चा केली. मात्र ज्या वेळी ३९ लोक राज्याच्या बाहेर जातात आणि त्यांची मतं काही वेगळी असतात. तर दुरुस्ती करण्यात काही स्कोप राहत नाही.
माझ्या मते उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये एखाद्यावर विश्वास टाकल्यानंतर त्याच्यावर पूर्ण जबाबदारी द्यायची. उद्धव ठाकरे यांनी संघटनेची विधीमंडळाची पूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. त्याचा परिणाम बंडखोरी आहे का हे मला माहिती नाही.
महाविकास आघाडी सरकार कमी पडले नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेतील नेत्यांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. ३८ आमदार बाहेर जातात ही काही साधी बाब नाही. हे आमदार बाहेर नेण्याची कुवत शिंदे यांनी दाखवली यातच त्यांचे यश आहे. या योजनेची तयारी आधीच होती, असे ऐकण्यात येत आहे. राज्यातून सुरत, सुरतहून आसाम अशी योजना एका दिवसात होत नाही.
एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी पडली आहे. माझं त्यांचं बोलणं झालं. त्यांना मी शुभेच्छा दिल्या. एकदा शपथ घेतल्यानंतर तो राज्याचा प्रमुख होतो. राज्यातील सर्व विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून काम व्हावे, अशी माझी अपेक्षा आहेत. त्यासाठी मी त्यांना अंत:करणातून शुभेच्छा देईन.
आताचे मुख्यमंत्री झाले ते ठाण्याचे प्रतिनिधी आहेत. अनेक वर्षे त्यांचे ठाणे जिल्ह्यात काम आहे. पण ते मूळ सातारा जिल्ह्यातील आहेत. योगायोग असा आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री साताऱ्याचे होते. मी मुख्यमंत्री झालो. माझे मूळ गावा साताऱ्यात आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील होते. आता एकनाथ शिंदे हेदेखील सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सातरा जिल्ह्याला लॉटरील गालली असे म्हणावे लागेल.
एकदा मुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर त्याच यंत्रणेतील अन्य पदं स्वीकारण्याची उदाहरणं महाराष्ट्रात यापूर्वी होती. माझ्या मंत्रीमंडळामध्ये शकंरराव चव्हाण अर्थमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मी मंत्री होतो. पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा शंकरराव माझ्या मंत्रिमंडळात आले. शंकरराव यांच्यानंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते, पुढे ते मंत्री झाले. अशोकराव चव्हाण सध्याचे जे मंत्री होते आमचे सहकारी होती, तेदेखील मुख्यमंत्री होते. अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडलेली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही.
दुसरं आश्चर्य म्हणजे, या कार्यपद्धतीमध्ये आदेश एकदा दिल्यानंतर तो तंतोतंत पाळावा लागतो. त्याचं उदाहरणं म्हणजे जे मुख्यमंत्री होते, नंतर विरोधी पक्षाचे नेतृत्व केलं त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते, याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले.
गेले काही दिवस, या राज्यातील काही आमदार आसाम राज्यात गेले होते. एक तर राज्याचे नेतृत्व बदलण्याची त्यांची इच्छा असावी. आसाममध्ये जे सहकारी गेले आणि त्यांचे ज्यांनी नेतृत्व केले मला वाटत नाही की त्यांची अपेक्षा ही उपमुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक होती. पण भाजपामध्ये एकदा आदेश आला की त्याच्यामध्ये तडजोड नसते. हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर आली. याची कल्पना कोणालाही नव्हती. कदाचित शिंदे यांना नव्हती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
बेसावध राहू नका, जपून पाऊल टाका, असा सल्ला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्या शुभेच्छा
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंत आत फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील.
एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तसेच भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचा जयजयकार केला.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत.
राज्यपाल भगसिंह कोश्यारी दाखल झाले असून काही क्षणात शपथविधीला सुरुवात होणार आहे. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा काही क्षणातच शपथविधी होणार आहे. त्यासाठी अनेक नेते उपस्थित आहेत. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर, आशिष शेलार असे भाजपाचे नेते या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.
अमित शाह म्हणाले, "भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनंतीवरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन केलं. तसेच महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रती त्यांची खरी निष्ठा आणि सेवाभाव दाखवतो. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन."
"देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं"; भाजपा अध्यक्षांचा आदेश
https://twitter.com/LoksattaLive/status/1542477244450234368
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली. "भाजपाचे कार्यकर्ते असो की एकनाथ शिंदे याचे शिवसैनिक असो कुणालाही शपथविधी सोहळ्याला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो," असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, "भाजपाकडे १२० चं संख्याबळ आहे. असं असताना मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद पाहिजे असं काही नव्हतं. जे घडलं ते तुमच्यासमोर होतं."
आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा आजन्म विरोध केला, हिंदुत्वाचा विरोध केला, सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करुन भाजपाला बाहेर ठेवला. हा जनमताचा अपमान होता. जनतेनं मतं महाविकास आघाडीला दिलं नव्हतं. ते युतीला दिलं होतं. जनमताचा अपमान करुन महाविकास आघाडी जन्माला आली.
चालू कामांना स्थगिती, नवी विकास योजना नाही, प्रचंड भ्रष्टाचार आपल्याला पहायला मिळाला : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ५६ जागांसह भाजपा-शिवसेना युतीने १६१ जागा जिंकल्या. अपक्ष मिळून १७० लोक निवडून आले होते. यावेळी ही अपेक्षा होती की भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. तेव्हा मोदींनी सर्वांच्या उपस्थितीने भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणाही केली होती. निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला."
एकनाथ शिंदे यांनी मुंबईत भाजपा नेत्यांच्या भेटीची माहिती ट्वीट करत दिली. ते म्हणाले, "भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली."
https://twitter.com/mieknathshinde/status/1542453803756433408
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा सादर, सोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व इतर भाजपा नेतेही हजर, सायंकाळी राजभवनातील राजदरबार हॉलमध्ये शपथविधी होण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीनंतर दोन्ही नेते राजभवनावर जाणार आहेत. यानंतर संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात यासाठी तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा, आईव्ह अपडेट
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर बुधवारी (२९ जून) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. या प्रत्येक वेगवान घडामोडीची लाईव्ह अपडेट...