राज्यात सद्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर गावंच्या गावं पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली आहे. या गावांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील दोन हजार ६०० नागरीकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. लष्कराचे एक पथक, एनडीआरएफचे एक पथक, एसडीआरएफच्या दोन टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची सद्याची पूर परिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्यावर वाहत आहे. तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर वाहत असून नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक SDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे माहिती मिळाली होती. आतापर्यंत ३९७ लोकांना १० निवारा केंदात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. हेही वाचा - आमदारांची अपात्रता, दहावं परिशिष्ट आणि पक्षांतराची व्याख्या.. सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय घडलं? यवतमाळ जिल्ह्यात जून ते आतापर्यंत ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच जिल्हयात नागपूरचे SDRF चे एक पथक जिल्हयात दाखल झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ टीम व तालुका प्रशासन यांनी २ हजार २४७ लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी हलविले आहे. कोंकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ पासून ते सायंकाळी ७ पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती? राज्यात पुरामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अतिवृष्टीमुळे १०९ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे आतापर्यंत ४४ घरांचे पूर्णत:, तर २०८६ घरांचे अशंत: नुकसान झाले आहे. हेही वाचा - पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने चाकूने भोसकून तरुणाचा खून; वडगाव शेरी परिसरातील घटना राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या तैनात मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, चंद्रपूर-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१, चंद्रपूर -२, यवतमाळ-१ अशा एकूण पाच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.