कर्जत तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. यातील तब्बल १८ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच कारभारी होणार आहेत.
मुदत संपलेल्या तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतींपैकी १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २२ डिसेंबर रोजी झाल्या होत्या. मात्र सत्ताधाऱ्यांची मुदत या महिन्यात संपत असल्याने नवीन सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया आता सुरू होत आहे. तोरकडवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक मात्र बिनविरोध झाली होती.
रविवारी खातगाव, नवसरवाडी, शिंदे, लोणीमसदपूर, माही व निबोंडी या सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. सोमवारी सितपू, जळगाव, बिटकेवाडी, मंगळवारी (दि. २५) राशिन, देशमुखवाडी, कानगुडवाडी, सोनाळवाडी, परीटवाडी, काळेवाडी व अंबीजळगाव आणि तोरकडवाडी येथे दि. २७ ला ही निवडणूक होणार आहे.
या अठरा ग्रामपंचायतींवर आमचेच वर्चस्व आहे असा दावा दोन्ही काँग्रेससह भाजप, शिवसेना, मनसे अशा सर्वच पक्षांनी केला आहे. त्यामुळे निवडीनंतरच या गोष्टीचा फैसला होईल. काही ठिकाणची संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.