वेदांत समूह आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला वळवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आज पुण्यात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला वळवल्यावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं आहे. त्यांनी घरगुती दौरे बंद करावेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी याहून मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं आहे. या आश्वासनाचाही सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला आहे. “मी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की, त्यांनी अजित पवारांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं, आम्ही त्यांना केंद्रात मोठं पद देऊ…” असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

हेही वाचा- कोट्यवधींचा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितली कारणं, म्हणाले…

पुढे त्यांनी म्हटलं की, वेदांत कंपनी गुजरातला जाणं, हा राजकारणाचा विषय नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी एकत्र यावं आणि सर्वांनी एकत्रितपणे केंद्र सरकारला विनंती करावी, ही गुंतवणूक महाराष्ट्राला ऑन मेरीट मिळाली आहे, ती ऑन मेरीटच राहिली पाहिजे.”

हेही वाचा- रवी राणांचे आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप; चार पोलिसांच्या आत्महत्येसंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रकल्प मिळत असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण महाराष्ट्राचा प्रकल्प तिकडे गेला, हे खूप मोठं दुर्दैव आहे. यामुळे लाखो नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला माझी विनंती आहे, त्यांनी यावर राजकीय करू नये, सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढावे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी इतर दौरे रद्द करून यावर चर्चा करावी. त्यांनी घरगुती दौरे बंद करावेत. पालकमंत्री नसल्याने राज्याचं नुकसान होत आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.