कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. या वेळी कर्जत शहर राज्यामध्ये स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाईल अशा पद्धतीने विकास करू, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांनी आज नगराध्यक्षपदाचा पदभार प्रदूषणमुक्त कर्जत करण्यासाठी ई व्हेईकल गाडीमध्ये येऊन स्वीकारला आणि आपल्या आगामी कामाच्या पद्धतीची चुणूक यानिमित्ताने कर्जतकरांना दाखवून दिली.

कर्जत नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. नगराध्यक्षपदी उषा अक्षय राऊत यांची निवड झाली आहे . आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. या वेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत व प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, उद्योजक दीपक शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, पालिकेचे उपघटक नेते सतीश पाटील, नगरसेवक अमृत काळदाते, भाऊसाहेब तोरडमल भास्कर भैलुमे, नगरसेविका ज्योती शेळके लंका बई खरात, मोनाली तोटे, अश्विनी दळवी, यांचे सह सर्व नगरसेवक व नगरपंचायत मुख्य अधिकारी गोविंद जाधव आणि त्यांचे सर्व कर्मचारी नागरिक या वेळी उपस्थित होते.

नगरपंचायत मध्ये पदभार स्वीकारण्यासाठी नगराध्यक्ष उषा राऊत आल्यानंतर प्रदूषण मुक्त कर्जत राहावे यासाठी फटाके वाजवले नाहीत, तसेच विधिवत धार्मिक विधी पूर्ण करून व ग्रामदैवत गोदड महाराज यांना वंदन करून पदभार स्वीकारण्यात आला. पदभार स्वीकारताच त्यांनी माझी वसुंधरा या अभियानामध्ये कर्जत नगरपंचायत चा राज्यामध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्व नगरसेवक, नगरपंचायतचे कर्मचारी आणि नागरिक यांच्या मदतीने प्रयत्न करणार असल्याचे उषा राऊत यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार रोहित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत  व प्रवीण घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळामध्ये कर्जत शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी आपण काम करणार आहे, माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देणार आहोत. नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. हे सर्व करताना कर्जत शहराला स्मार्ट सिटी अशी ओळख राज्यामध्ये निर्माण करणार आहे. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेले प्रदूषण विरहित वाहने त्यामध्ये इलेक्ट्रिक किंवा बॅटरीवरील वाहनांचा वापर नागरिकांनी करावा तसेच आठवडय़ातील एक दिवस कोणतेही वाहन न वापरता किंवा सायकलचा वापर स्थानिक काम करण्यासाठी करावा,असे त्या म्हणाल्या.