सावंतवाडी : पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या मालवण शहरात सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेच उपेक्षेचे शिकार ठरत आहेत. मालवण-देऊळवाडा सागरी महामार्ग नाका येथील एक महत्त्वाचा सीसीटीव्ही कॅमेरा झाडांच्या पाना आणि वेलींनी पूर्णपणे वेढला गेला आहे, ज्यामुळे तो प्रभावीपणे कार्य करू शकत नाही. “पोलिसांचा तिसरा डोळा” म्हणून गणला जाणारा हा कॅमेराच वेलींच्या गर्तेत हरवून गेल्याने देऊळवाडा नाक्यावरील हालचालींवर नजर कशी ठेवली जाणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
मालवण शहरात वाहतूक व्यवस्था आणि अन्य हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने काही मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यातील काही कॅमेरे अनेकदा बंद पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा सागरी महामार्ग नाका येथे कसाल-मालवण रस्ता आणि सागरी महामार्ग मिळतो. याच मार्गाने अनेक वाहने शहरात प्रवेश करतात आणि येथे आठवडा बाजारही भरतो, ज्यामुळे या नाक्यावर मोठी वाहतुकीची वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा सद्यस्थितीत वेलींनी पूर्णपणे झाकलेला आहे.
या स्थितीमुळे “वेलींच्या पानांमध्ये हरवून गेलेल्या या कॅमेऱ्यातून छायाचित्रण होत असेल का?” आणि “हा कॅमेरा देऊळवाडा परिसरात लक्ष कसे ठेवेल?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षिततेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यावरच झाडांच्या पाना आणि वेलींनी अतिक्रमण केल्याने पोलीस यंत्रणा किंवा स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची भावना आहे. वेलीत हरवलेल्या या कॅमेऱ्याबाबत पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन देखील अनभिज्ञ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या कॅमेऱ्यावरील वेली तातडीने हटवून तो पुन्हा कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मालवणच्या सुरक्षिततेसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांची योग्य निगा राखणे आणि ते नेहमी कार्यरत ठेवणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे.