करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच राज्यातील प्रार्थनास्थळं बंद आहेत. इतर गोष्टींवरील निर्बंध कमी होत असताना प्रार्थनास्थळं पुन्हा उघडण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी वारंवार होत आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

“आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम देत आहोत. १ तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. १ तारखेपासून सगळी मंदिरं उघडा आणि २ तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी २ तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचं आहे,” असं आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचंही सांगितलं.