काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात असताना ५० खोक्यांवरून शिवसेनेतील बंडखोरांवर खोचक विधान केलं. यावर आता शिंदे गटातील नेते आणि मंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “५० कोटी रुपयांच्या विषयाचा चोथा झाला आहे. आता लोक हसायला लागलेत या गोष्टींना,” असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलं. ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

दादाजी भुसे म्हणाले, “५० कोटी रुपयांच्या विषयाचा चोथा झाला आहे. या गोष्टीला आपण किती किंमत द्यायची याचाही विचार झाला पाहिजे. या गोष्टींना लोक हसायला लागले आहेत.”

“लोकांना समजते आहे की, चांगली विकासाची कामं होत आहेत, गोरगरिब जनतेच्या दृष्टिकोनातून विकासाची कामांबाबत चांगले निर्णय होत आहेत. त्यावरून दिशाभूल करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे,” असं मत दादाजी भुसेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “राहुल गांधींच्या वक्तव्याने मविआत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले, “सावरकरांबद्दल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“५० कोटींचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत”

“जनतेने ५० कोटी रुपयांच्या विषयाला महत्त्व दिलं असतं तर मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात जनता गेली असती का? राहिला विषय ५० कोटी रुपयांचा तर आरोप करणाऱ्यांनी त्याचे पुरावे द्यावेत,” असंही दादाजी भुसेंनी म्हटलं.