करोना काळामध्ये इतर मुद्द्यांप्रमाणेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षा, त्यांचे निकाल, त्यांचं झालेलं नुकसान हा मुद्दा चर्चेचा ठरला होता. पुण्यामध्ये ऐन करोनाच्या संकटामध्ये एमपीएससीच्या परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. करोना काळात परीक्षा स्थगित केल्यामुळे या परीक्षा घेण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. मात्र, त्यानंतर करोनाचं संकट वाढल्यामुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एमपीएससीच्या परीक्षार्थींना आता परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.