राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित असतानाच आता मुस्लीम आरक्षणासाठीही आवाज उठवला जात आहे. MIM चे असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्वाखाली आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा आक्रमक वळण घेताना दिसत आहे. औरंगाबादनंतर आता सोलापूरमधूनही मुस्लीम आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक देण्यात आली आहे. ११ डिसेंबरला मुस्लीम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी मुंबईला जाणार आहोत, अशी घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी आज केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणायचे की एमआयएमला मत देऊ नका, शिवसेना आणि भाजपला फायदा होईल. त्याचा परिणामही झाला. सोलापूरात काहींना ते खरं वाटलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आम्हाला भाजपची बी टीम म्हटलं. जेव्हा सत्ता स्थापना करावी लागली तेव्हा हेच लोक एकत्र आले आणि म्हटले आपण सगळे एक आहोत आणि मुसलमानांना धोका नाही. शिवसेना सेक्युलर नाही. ते भाजपासारखेच जातीयवादी आहेत. पवार साहेब सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? राहुल गांधी सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? तुम्ही विसरलात का १९९२ ला काय झालं? असा सवाल ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.

शिवसेनेच्या भूमिकेबद्दल आक्रमक होत ओवेसी यांनी उद्धव ठाकरे यांना सवालही केला आहे. ते म्हणाले, शिवसेनेला तुम्ही सेक्युलर बनवलं आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात. तिन्ही एकत्र येऊन सरकार चालवतात आणि म्हणतात सेक्युलॅरिझम वाचवायचं आहे. उद्धव ठाकरे विधानसभेत मंदिर आणि मशिदीबाबत बोलतात. तुम्हाला लाज वाटत नाही? उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की बाबरी मशिद आम्ही पाडली. तेव्हा सेक्युलर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटली नाही?