आपली स्वतंत्र आंबट-गोड चव आणि सुगंध कायम राखण्याची नागपुरी संत्र्याची तपश्चर्या अखेर फळाला आली असून विदर्भातील या संत्र्याला आता ‘नागपूर ऑरेंज’ असे जिऑग्राफिकल इंडिकेशन (जीआय) मिळाल्याने इतर प्रांतांतील संत्र्यांपेक्षा त्याचा दर्जा वाढला आहे. विशेष म्हणजे जगभर गवगवा असलेला कोकणचा राजा हापूस आंबा अजूनही ‘जीआय’च्या रांगेत अढीला ठेवला गेला असून त्याची तपश्चर्या अजून पक्व झालेली नाही!
नागपुरी संत्र्याचा जीआय क्रमांक ३८५ आहे. एखाद्या फळपिकाला जीआय मिळवून देणारे अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. आत्तापर्यंत वस्तू, कला किंवा फळांना उत्पादक संघांनी जीआय मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडली. मात्र, वैदर्भीय संत्री उत्पादकांच्या पिकांना संरक्षण मिळवून देण्याचे काम प्रथमच विद्यापीठातील संशोधकांच्या एकत्रित प्रयत्नांमधून झाले, हे विशेष.
संत्र्याला मिळालेला जीआय दर्जा वैदर्भीय शेतकऱ्यांच्या पणन धोरणाला पूरक ठरणार आहे. संत्र्याची आंबट-गोड चव, सहज काढता येणारे साल, टिकाऊपणा आणि साल काढताना येणारा सुगंध, असे त्याचे खास वैशिष्टय़ आहे. पंजाबातून येणाऱ्या ‘किन्नो’ या संत्र्याबरोबरच दिल्ली, मध्य प्रदेश या भागातून महाराष्ट्रात संत्री येतात. नागपूरची संत्री म्हणून ती खपवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. अशी फसवणूक यापुढे टाळली जाणार आहे.
माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे आणि माजी संशोधन संचालक डॉ. शिवाजी सरोदे यांच्या कार्यकाळात जीआय मिळवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली, तर विद्यमान कुलगुरू डॉ. आर. जी. दाणी यांनी या उपक्रमाला गती दिली. उद्यान विभागप्रमुख डॉ. विजय दोड यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय काळे आणि डॉ. शशांक भराड यांच्या समितीने मद्रासमधील जीआय कार्यालयात वेळोवेळी झालेल्या सादरीकरणात भाग घेऊन नागपूर संत्र्याचे महत्त्व पटवून दिले. यासंदर्भात डॉ. दोड म्हणाले, जीआय मानांकनामुळे या भागातील संत्री उत्पादकांना संरक्षण मिळणार आहे. संत्री निर्यात करताना ‘नागपूर संत्री’ लोगो लावणे व्यापाऱ्यांना बंधनकारक राहील. त्यामुळे शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक टाळता येईल. जीआय कार्यालयाला नागपूर संत्र्याचे वैशिष्टय़ पटवून देताना त्याची ऐतिहासिक
पाश्र्वभूमी, नकाशा आणि क्षेत्राची माहिती देताना विद्यापीठाने प्रचंड मेहनत घेतली. संत्र्याचे उत्पादन घेणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांची नावे कार्यालयात सादर करण्यात आली.
कोकणच्या राजालाही प्रतीक्षा
जिऑग्राफिकल इंडिकेशन यापूर्वी सोलापुरी चादर, पुणेरी पगडी, कोल्हापुरी गूळ, वारली पेंटिंग, नाशिकची वाईन, पैठणी साडी आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी इत्यादी उत्पादनांना प्राप्त झाले आहे. अजूनही हैदराबादी बिर्याणी, गुजराथी बांधणी, बासमती, हैदराबादचा बैगनफल्ली आंबा, कोकणचा राजा हापूस आंब्यासारखी लोकप्रिय उत्पादने जीआय मिळण्याची वाट पाहत आहेत.
संत्रा कलमांची मागणी वाढणार
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत दर वर्षी संत्र्यांची २५ ते ३० लाख कलमे विकली जातात. विदर्भाबरोबरच मराठवाडय़ातील नांदेडपर्यंत ही कलमे जातात. शिवाय, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागांतील शेतकरीही या कलमांची मागणी करतात. जीआय मानांकनामुळे आता संत्र्यांच्या कलमांमध्येही वाढ होण्याची शक्यता विद्यापीठातील प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे. या संधीचा फायदा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मार्केटिंगसाठी करताना उत्पादनाबरोबरच गुणवत्तावाढीवर भर देणे अपेक्षित आहे.