राज्यात सध्या चर्चेत असलेला वाद आता हळूहळू थंड होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या या वादामुळे राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबली होती. मात्र आता ती लवकरच पुन्हा सुरू होत आहे. त्या आधी राणे यांनी आज आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात हजेरी लावली.

राज्यभरात होणाऱ्या या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी हे रुटीन चेकअप करण्यात येत आहे. राणे यांना रुग्णालयात अॅडमिट केलेलं नाही, अशी माहिती भाजपा नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.

नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार होता. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.

नारायण राणे उद्यापासून महाराष्ट्रातील अर्धवट राहिलेली त्यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ पुन्हा सुरू करणार आहेत. गेल्या दोन दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर राणेंनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिंधुदुर्गमधून पुन्हा यात्रेला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राणे यांच्या दौऱ्याचा मार्ग पूर्वी होता तोच असणार आहे.