गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार चर्चेचा विषय ठरले आहेत. एकीकडे राज्य सरकारच्या धोरणांवर अजित पवार सातत्याने टीका करत असतानाच दुसरीकडे अजित पवार सत्ताधाऱ्यांसमवेत हातमिळवणी करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या. यावर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वत: अजित पवारांनीही असं काहीही नसल्याचं स्पष्टीकरण देऊनही या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच, अजित पवार ‘नॉट रीचेबल’ असल्याच्या चर्चांना अनेकदा उधाण आलं. एवढं की अजित पवार आता या चर्चांना चांगलेच वैतागले आहेत.
अजित पवार यांनी या ‘नॉट रीचेबल’ प्रकरणावर परखड शब्दांत टीका केली आहे. बारामतीमध्ये एका कार्यक्रमाला अजित पवारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी स्टेजवरून बोलताना अजित पवारांनी या प्रकरणावर त्यांच्या शैलीत टिप्पणी केली.
“मी एकदाच एक घाव दोन तुकडे करतो, सारखं…”
“अशा गोष्टींवर मला सारखं सारखं जाऊन सांगावंसं वाटत नाही. मी माझं एकदाच काय ते एक घाव दोन तुकडे करतो. जरा कुठे दिसलो नाही की लगेच ‘नॉट रीचेबल’. बाकी १३ – १४ कोटी माणसं आहेत ना. एवढा अजित पवार का आवडायला लागलाय? बाकीच्यांकडं पण बघा की. दुसरं काही सुचतच नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
“राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विकासाची, पण…”, अजित पवारांनी बारसू रिफायनरीबाबत स्पष्ट केली भूमिका
“दिल्लीचा पत्रकार येतो, मला विचारतो तुम्ही इकडं कसं काय? आरे माझे कार्यक्रम ठरलेत. कार्यक्रम रद्द केले तर म्हणतात दादांनी कार्यक्रम रद्द केले. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तर म्हणतात तिकडच्या कार्यक्रमाला दादा गेले नाहीत. आता काय अर्धा भाग तिकडं आणि अर्धा भाग इकडं आणू? मला काय कळत नाही. एखाद्याच्या मागे हात धुवून लागायचं ते किती लागायचं?” असा मिश्किल सवालही अजित पवारांनी यावेळी केला.
गौतमी पाटीलवरून टोलेबाजी!
दरम्यान, गौतमी पाटीलबाबत बोलतानाही अजित पवारांनी मिश्किल टोलेबाजी केली. समोर बसलेल्यांपैकी कुणीतरी यात्रेचा उल्लेख करताच अजित पवार म्हणाले, “यात्रा असली तरी यात्रा रात्री. रात्री कापाकापी. रात्री तमाशा. पाटील बाईला बोलवायचं ना रात्री. काय नाव तिचं? गौतमी. तिला मी मधे काहीतरी बोललो. ती म्हणाली दादांनी मला अमुक काही सांगितलं. मी म्हटलं सगळ्यांना पाहाता येईल असं काम सगळ्यांनी करावं एवढंच माझं म्हणणं आहे”!