साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर आक्षेप घेत निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचं आवाहन केलं आहे. मी निवडून आलो आहे हे मला माहित आहे मात्र मिळालेली मतं आणि मतदान यामध्ये तफावत आहे असा आरोप उदयनराजेंनी केला. इतकंच नाही तर फेरनिवडणूक घेण्याचंही आवाहन केलं. साताऱ्यातली फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, जर त्यानंतर निकालात असाच फरक आढळला तर मिशाच नाही भुवयाही काढून फिरेन असं खुलं आव्हानच उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोगाला दिलं.

ईव्हीएम मशीनमधला घोळ म्हणजे देशातील सामान्य नागरिकांची फसवणूक आहे. या प्रकरणावर देशातल्या प्रत्येक नागरिकाने बोललं पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. तसंच यावर देशभरात खुली चर्चा झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. आपल्या देशात ईव्हीएमवर पाच हजार कोटी रूपयांचा वायफळ खर्च झाला असून हे प्रकरण आबरा का डाबरा असं आहे. मशीनधमध्ये जर व्हायरस गेला असं कोणी म्हणत असेल तर देशाचे सभागृह चालवणाऱ्यांचा हा व्हायरस आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याआधीही २२ जून रोजीही एक फेसबुक पोस्ट लिहून उदयनराजे यांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवला होता. तसेच हवं असल्यास मी खासदारकीचा राजीनामा देतो निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घ्यावी अशीही मागणी उदयनराजे भोसले यांनी केली होती. आता तर थेट फेरनिवडणूक घ्या मतांमध्ये एवढीच तफावत आढळली तर मिशाच नाही भुवयाही काढून फिरेन असे उदयनराजेंनी म्हटले आहे. आता निवडणूक आयोग यावर काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.