भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना चांगलेच टोले लगावले होते. चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी पुण्यात आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक धक्कादायक विधान केले होते. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वादात भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील उडी घेत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे म्हणाले, “चंद्रकांत पाटील अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठे नेते नाहीत, त्यांना मोठा नेता  मानण्याचे कारण देखील नाही, त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही.”

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रीपद देऊ नये असा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता’ असा गौप्यस्फोट होता. याला धरूनच पहाटे जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र शपथ घेतली होती. तेव्हा हाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता का?असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. 

यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “याची गरजच नव्हती. कारण देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात. राज्यात काय चाललय याबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका, शिवसेनेने सतत त्रास दिल्यानंतरही महाराष्ट्रात सलग पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहीले आहेत. तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरुन उरले.”