बिहारने या महिन्याच्या सुरुवातीलाच जातनिहाय पाहणी अहवाल सादर केला. या अहवालानुसार, बिहारमध्ये एकूण ओबीसी ६३.१ टक्के आहेत. ही टक्केवारी मंडल आयोगाच्या अहवालातील सरासरी टक्केवारीपेक्षा जास्त असल्यामुळे आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हा अहवाल आल्यानंतर महाराष्ट्रातही ओबीसीगणनेच्या मागणीने जोर धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०११ सालातील तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या लोकसभेतील भाषणाचा मुद्दा आज उपस्थित केला. ते वाशिम जिल्ह्यातील ओबीसी जागर यात्रेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.

“ओबीसी समाजाचा व्यक्ती पंतप्रधान झाला की काँग्रेसच्या पोटात दुखतं. म्हणून पंतप्रधानांना नीच म्हटलं जातं, मौत का सौदागर म्हटलं जातं. अशा प्रकरे हिणवण्याचं काम केलं जातं”, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. तसंच, “काँग्रेसने आजपर्यंत २५० मुख्यमंत्री दिले. २५० पैकी १७ टक्के मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे आहेत. भाजपाने आतापर्यंत ६८ मुख्यमंत्री दिले त्यापैकी ३८ टक्के मुख्यमंत्री ओबीसीचे होते. ओबीसींकरता भाषण करून अधिकारिता मिळत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

“या भारताला मजबूत राष्ट्र बनवलं त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. आज भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था झाला, याचं कारण नरेंद्र मोदींचं नेतृत्त्व आहे. भारत आता अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. अर्थव्यवस्था मोठी झाल्यावर रोजगार निर्माण होतो, पायाभूत सुविधा तयार होतात. गरिबाला पाणी, गॅस, वीज मिळतं. रस्ते, पूल तयार होतात. पाटबंधारेच्या योजना तयार होतात, हे सगळं करण्याचं काम मोदींच्या नेतृत्त्वात झालंय. ओबीसीच्या जनगणनेला आम्ही कधीच नाही म्हटलं नाही. पण, १९३१ नंतर या देशात कधीच जातीय जनगणना झाली नाही. एससी-एसटी वगळता इतर जातगणना झाली नाही”, असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी चिदंबरम यांच्या २०११ सालच्या एका भाषणाचाही दाखला त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“७ मे २०११ तत्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी लोकसभेत सांगितलं होतं की एससी-एसटी वगळता कोणत्याच समाजाची आम्ही जातीय जनगणना करणार नाही. पुढे जाऊन सांगितलं की स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या काळातच ठरलं की जातीय जनगणना करायची नाही, असं लोकसभेमध्ये मंत्री म्हणून सांगतात आणि दुसरीकडे म्हणतात की जातीची जनगणना का होत नाही?” असंही फडणवीस म्हणाले.