लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास उघडी राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला परवानगी दिली आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी करोनाविषयीच्या उपयाययोजनांच्या संदर्भात एक बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न-धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळण्यात याव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले आहे.