जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले. या अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची पाठ गारपीट सोडत नसल्याचे चित्र आहे. मागील पंधरवडय़ात उस्मानाबाद तालुक्यातील गुंजेवाडीला झोडपून काढल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा चिलवडी गावाला गारपिटीने झोडपले. या सततच्या गारपिटीमुळे शेतकरी मात्र पुरता सर्द झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी गारपिटीमुळे जिल्ह्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्राची हानी झाली. त्या गारपीटग्रस्तांच्या खात्यात अनुदान अद्याप जमा झाले नसताना पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला आहे. गुंजेवाडीपाठोपाठ उस्मानाबाद तालुक्यातील चिलवडी गावाला बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने झोडपले. वादळी वारा, पावसाबरोबर अचानक गारपीट सुरू झाल्यामुळे शिवारात काम करणारे शेतकरी व मजुरांना गारांचा मार सहन करावा लागला. सुपारीएवढय़ा आकाराच्या गारा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांबरोबरच जनावरांनाही मोठा मार बसला. अनेक ठिकाणी अजूनही ज्वारी पीककाढणी, मळणीची कामे सुरू आहेत. त्यातच गारपीट होत असल्यामुळे पूर्वीच्या तडाख्यातून शिल्लक राहिलेली ज्वारीही धुळीस मिळत आहे.
गारपीट अजून किती काळ होणार, त्यामुळे शेतजमिनीचा पोत खालावणार का, अशा अनेक प्रश्नांमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. चिलवडीत झालेल्या गारांचा आकार व त्याचे स्वरूप पाहता, शेतीला त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे प्राथमिकदृष्टय़ा स्पष्ट होत आहे. कांद्याच्या पिकाप्रमाणे शेतजमिनीस या गारा बाधा पोहोचवणार काय, याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे.
आत्महत्येतही ‘पात्रता’
औरंगाबाद : दुष्काळानंतर मराठवाडय़ात गारपिटीचा प्रकोप झाला. २२ फेब्रुवारी ते २९ एप्रिल दरम्यान ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारने ‘पात्र’ ठरवल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून द्यावयाची एक लाख रुपयांची मदत मात्र लालफितीत अडकली आहे. तब्बल २२ शेतकऱ्यांना ‘निधी’ नसल्याने मदतच मिळू शकलेली नाही.