वाहतूक सुविधेची प्रतीक्षा रत्नागिरी : यंदाच्या मोसमात भारतातील विविध प्रकारचे आंबे अमेरिकेत निर्यात करण्यास तेथील कृषी विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे तांत्रिक अडथळा दूर झाला असला तरी करोनाच्या उद्रेकामुळे असलेले प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध पूर्णपणे उठण्याची निर्यातदारांना प्रतीक्षा आहे. हापूस आंब्याला अमेरिकेत मोठी मागणी आहे. पण करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासाला लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अमेरिकेच्या कृषी विभागातील निरीक्षकांना आंब्यांवरील वि-किरण सुविधेची तपासणी करण्यासाठी भारतात येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे २०२० पासून भारतीय आंब्यांची अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर मर्यादा आल्या होत्या. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाची १२ वी बैठक झाली. त्यातील निर्णयांना अनुसरून भारताचे कृषी मंत्रालय आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यात परस्परांच्या कृषी बाजारांमध्ये मालाला प्रवेश देण्याचा करार झाला. या करारानुसार, भारतीय आंबे आणि र्डांळबांची अमेरिकेला निर्यात होणार असून अमेरिकेची चेरी आणि अल्फाल्फा ही पिके भारतात आयात होणार आहेत. मात्र यासाठी वि-किरण प्रक्रिया अत्यावश्यक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाकडून निर्यातीसाठी मिळालेल्या मंजुरीमुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पिकणाऱ्या लंगडा, दशहरी, फझली आदी आंब्यांसह कोकणातील हापूसची चव अमेरिकन ग्राहकांना चाखावयास मिळणार आहे. देशभरातून अमेरिकेला सुमारे १ हजार टन आंबा निर्यात होतो. त्यामध्ये सुमारे ३०० टन कोकणचा हापूस आंबा असतो. अमेरिकेत या आंब्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे येत्या हंगामात या आंब्याची २०१९-२० पेक्षा जास्त निर्यात होईल, असा अंदाज निर्यातदारांनी वर्तवला आहे. या निर्णयामुळे आंबा उत्पादकांना चांगला लाभ मिळेल, असा अंदाज प्रसिद्ध बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्त केला, तर निर्यात सुलभ झाली असली तरी प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध पूर्णपणे उठल्यशिवाय या निर्णयाचा फायदा होणार नाही, असे मत निर्यातदार सलिल दामले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, केवळ मालवाहतूक करणाऱ्या हवाई सेवेद्वारे आंब्याची निर्यात करणे परवडत नाही. प्रवासी वाहतुकीच्या विमानांमधून हा माल पाठवणे किफायतशीर ठरते. म्हणून त्या वाहतुकीवरील निर्बंध पूर्णपणे उठल्यशिवाय या निर्णयाचा पुरेपूर फायदा होणार नाही. अस्मानी संकटाचा सामना अशा प्रकारे एकीकडे निर्यातवाढीची स्वप्ने बघत असतानाच दुसरीकडे अवकाळी पाऊस, बोचरी थंडी आणि पाठोपाठ ढगाळ वातावरण अशा हवामानातील विचित्र बदलांना आंबा बागायतदारांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत:, तुडतुडा, फुलकिडा यासारख्या हापूसवरील कीडरोगांना ढगाळ वातावरण जणू निमंत्रणच ठरले आहे. या संकटांवर मात करण्यासाठी औषध फवारणी वाढली असून पर्यायाने खर्चात भर पडली आहे.