७५ टक्के रोपे जिवंत; कांदळवन रोपांच्या लागवडीला आरंभ

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्षरोप लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत २०१६ पासून पालघर जिल्ह्यात एक कोटी ६२ लाख रोपे लावण्यात आली आहेत. त्यापैकी ७५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. यामुळे जिल्ह्यातील हरित पट्टय़ात वाढ झालेली दिसणार आहे. या यशानंतर वन विभागाच्या वतीने तिवरांच्या वृक्षरोपांची लागवड हाती घेण्यात आली आहे.

शासनाच्या वृक्ष रोपवन उपक्रमात  वनविभाग, इतर शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांकडून नियोजित ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. त्या अंतर्गत २०१६ (दोन कोटी वृक्ष रोपवन) योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात आठ लक्ष १३ हजार वृक्षरोपे,  २०१७ (चार कोटी वृक्ष रोपवन) अंतर्गत २२ लाख  ९० हजार रोपांची लागवड झाली.  २०१८ (१३ कोटी वृक्ष (रोपवन) प्रकल्पांतर्गत ४७ लक्ष ३२ लाख झाडे तर २०१९ (३३ कोटी वृक्ष रोपवन) प्रकल्पांतर्गत ८३लाख ३९ हजार झाडांची लागवड करण्यात आली.

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पालघर वन विभागांतर्गत सावरा एमबुर येथे २० हेक्टर जागेमध्ये २२ हजार ५०० झाडांची लागवड करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात झाडांच्या जगण्याचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगले असल्याची माहिती डहाणूचे उपवनसंरक्षक विजय भिसे यांनी दिली आहे. रोपवन लागवडीनंतर पहिल्या काही वर्षांत इतर भागांमध्ये झाडे मृत पावत असताना पालघर जिल्ह्यात पहिल्या वर्षी सुमारे ९० टक्के व नंतर सुमारे ७५ टक्के झाडे जिवंत असल्याचे दिसून आल्याचे विजय भिसे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी २३८ हेक्टरवर तिवरांच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यंदाच्या वर्षी या महिन्याअखेरीस पालघर वन उपविभागाच्या सहा निवडलेल्या ठिकाणी ७५ हेक्टर खाजण जमिनीवर ३३ हजार तिवरांच्या वृक्षरोपांची  लागवड करण्यात येणार असल्याचे विजय भिसे यांनी सांगितले.

वनविभाग तसेच इतर शासकीय विभागांकडून वृक्षलागवडीसाठी मिळालेल्या सहकार्यामुळे आगामी काळात जिल्ह्य़ातील हरीत पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रोप लागवड अशी

वर्ष    लागवड     जिवंत  झाडे    टक्केवारी

२०१६  ३४,५५७०     २,४७४९१      ७१.६२

२०१७  ७२,८९७३     ५,३९५२४      ७४.०१

२०१८  १६,७६५००    १२,९१५८१    ७७.०४

२०१९  १९,७२०५९    १६,३६५७४    ८२.९९

२०२०  २२,५००         २२, ५००        १००

१ कोटी ६२ लाख

रोपलागवडीची राज्यभरात अभियान

८ लाख १३ हजार

वृक्षरोपांची पालघर जिल्ह्यात लागवड (२०१६)