केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे उस्मानाबादशी अतूट नाते होते. निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले, त्या वेळी केंद्रात सत्ता आल्यानंतर सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गासाठी आपण आग्रही राहू, असे म्हटले होते. उस्मानाबादकरांच्या मनात अशा अनेक आठवणींचे ढग आता जमा झाले आहेत. ‘जिल्ह्याचे जावई’ असलेल्या मुंडे यांच्या अकाली निधनामुळे उस्मानाबादकर हळहळ व्यक्त करीत आहेत. निधनाचे वृत्त कळताच जिल्हाभर कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला.
सकाळीच मुंडे यांचे निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. काही वेळ या वर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. कोणतीही निवडणूक असो, उस्मानाबादमध्ये मुंडे यांची प्रचारसभा ठरलेली असे. कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे मुंडे यांच्यावर नियतीने घातलेली झडप अनेकांना भावूक करून गेली. शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यासमोर सकाळी ११ वाजता या लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी आमदार राणाजगजितसिंह पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे अध्यक्ष अरिवद गोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, जि.प.चे उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय िनबाळकर, मिलिंद पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते, सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, व्यापारी महासंघाचे संजय मंत्री, बंटी जाधव यांच्यासह अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनीही या दुखात सहभाग नोंदवत बाजारपेठ बंद ठेवली.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तुळजापूर व भूम येथे झालेली मुंडे यांची सभा आजही अनेकांच्या डोळ्यासमोर आहे. या सभेत महायुतीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेला आधार पुढील काळात कोण देणार, अशी भावना सर्वसामान्य कार्यकत्रे व्यक्त करीत आहेत. निवडणुकानंतर तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सहकुटुंब तुळजापुरात आले होते, हीच मुंडे यांची उस्मानाबादकरांसाठी शेवटची भेट ठरली.
माजी मंत्री राणाजगजितसिंह – मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेले, प्रश्नांना थेट भिडणारे मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. राजकारणापलीकडे जाऊन काम करण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. उस्मानाबादेत आल्यानंतर त्यांना सहज चहापानासाठी बोलावले असता, जराही संकोच न करता ते आमच्या घरी येऊन गेले. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील व त्यांचे चांगले संबंध होते. राजकारणापलिकडे जाऊन त्यांनी ते पाळलेदेखील.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण – मराठवाडय़ाचा लढवय्या नेता हरवला. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयातून राज्याच्या ग्रामीण विकासाला चालना मिळेल, अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. मात्र, नियतीने वेगळेच काही ठरविले होते.