अहिल्यानगर : प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेलेले १५० भाविक चेंगराचेंगरीमुळे एकाच जागी अडकून पडले. अन्न-पाण्यावाचून, जीव मुठीत धरून तब्बल १८ तासांच्या खोळंब्यानंतर या यात्रेकरूंमधील काही तरुणांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावत वाहतूक कोंडी फोडण्यास हातभार लावला.

अहिल्यानगरसह जखणगाव, हिंगणगाव, हिवरेबाजार ही जिल्ह्यातील गावे आणि छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, बीडचे १५० भाविक कुंभमेळ्यात मौनी अमावास्येची पर्वणी साधून संगमस्नानासाठी गेले होते. मात्र बुधवारी आखाडा मार्गावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मेळा काही काळासाठी थांबविण्यात आला. सहा ते आठ कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले असल्यामुळे आणि दुर्घटनेमुळे तेथील व्यवस्था कोलमडल्याचे चित्र होते. चेंगराचेंगरीनंतर चार तासांनी कुंभमेळ्यात पोहोचलेल्या राज्यातील १५० भाविकांच्या खासगी तीन बस वाहनतळावरच अडकून पडल्या. पिण्यास पाणी नाही, खायला अन्न नाही, अशी स्थिती होती. अनेक तासांनी मुंगीच्या पावलाने बस मुख्य रस्त्यांपर्यंत आल्या. मात्र तेथून अयोध्येकडे जाणाऱ्या रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी होती. वाहनांच्या रांगा २० किमीपर्यंत गेल्या होत्या. कोंडीतून सुटका होत नाही, प्रशासन-पोलीस कोठे दिसत नाहीत, हे लक्षात आल्याने जखणगाव, हिंगणगाव, हिवरे बाजारचे तरुण रस्त्यावर उतरले. हातात काठ्या घेऊन त्यांनीच वाहतूक नियंत्रण सुरू केले. या ३०-४० तरुणांच्या प्रयत्नांमुळे अनेक वाहनांची कोंडीतून सुटका होऊ शकली. तीन तासांनंतर दोन किलोमीटरचा प्रवास ते करू शकले. जखणगावचे सरपंच डॉ. सुनीलप्रसाद गंधे हे भाविकांबरोबर होते. त्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून सहकार्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश, प्रयागराजमधील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क केला. मात्र या कशाचाही उपयोग झाला नाही. आता हे भाविक अयोध्येमध्ये रामलल्लाचे दर्शन घेऊन दोन दिवसांनी घरी परतणार आहेत.

ग्रामस्थांचा आधार, तिरंग्याची साथ

प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरीची घटना नुकतीच घडल्यामुळे राज्यातून गेलेले हे भाविक सावध होते. आपला गट फुटू नये, कुणी बेपत्ता होऊ नये यासाठी त्यांनी एक शक्कल लढविली.

एका उंच काठीवर तिरंगा ध्वज बांधण्यात आला. उंच धरलेल्या या राष्ट्रध्वजाने सर्वांना एकत्र ठेवले. अशा प्रकारे १० किमी अंतर चालत ते आपल्या वाहनापर्यंत पोहोचले.

दरम्यान वाटेत लागलेल्या गावांमधील सामान्य खेडुतांनी या भाविकांना पाणी दिले, तसेच डाळभातही खाऊ घातला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मौनी अमावास्येनिमित्त गंगास्नान झाले. मात्र गर्दीचे व्यवस्थापन कोठेही आढळत नव्हते. सरकार, प्रशासनाने कोणतेही नियोजन केलेले जाणवले नाही. पाण्याची बाटली ५० रुपयांना विकत घ्यावी लागली. मदत मागावी, अशी यंत्रणाच तिथे आढळली नाही.- डॉ. सुनीलप्रसाद गंधे, सरपंच, जखणगाव (ता. अहिल्यानगर)