तालुक्यात गिरणा नदीवर दाभाडी, पाटणे, सातभाई आणि मोसम नदीवर वडगाव, वडेल, काष्टी व कोठरे येथे सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली असून सुमारे १७ कोटींची ही सात बंधाऱ्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आ. दादा भुसे यांनी दिली. ही कामे पूर्ण झाल्यावर गिरणा व मोसम खोऱ्यातील पाणीटंचाई काही अंशी दूर होण्यास मदत होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कमी पर्जन्यमानामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरण बऱ्याच वेळा भरत नाही. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या लेखी अतितुटीचे खोरे म्हणून नोंद असलेल्या गिरणा व मोसम खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पाच दशलक्ष घनफूट क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे बंधारे बांधण्यास शासनाचे र्निबध आहेत. त्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून या बंधाऱ्यांची कामे मंजूर होण्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु या पाणलोट क्षेत्रातील चणकापूर धरणासह अन्य धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गाळ साचलेला आहे. त्यामुळे या धरणांसाठी जे पाणी गृहीत धरले जात आहे, तेवढे पाणी प्रत्यक्षात साठवता येत नाही. ही वस्तुस्थिती शासन दरबारी वेळोवेळी निदर्शनास आणून दिली व त्याचा सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन शासनाने १८७ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या बंधाऱ्यांना पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देतानाच नुकतीच मंजुरी दिली असल्याचे भुसे यांनी सांगितले. या बंधाऱ्यांच्या कामांची लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगून तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अन्य कामांचादेखील पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी बाजार समितीचे माजी सभापती बंडू बच्छाव, पंचायत समितीचे माजी सभापती शशी निकम, जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार आदी उपस्थित होते.