राज्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड ही दूषित पाण्याची शहरे असून ६५ हजार ९३० पाण्याचे नमुने दूषित आढल्याची धक्कादायक माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के असून पाण्याच्या नमुन्याची तपासणीही करण्यात येत नसल्याचा आरोप रमेश शेंडगे यांनी केला होता. अनेक जिल्ह्य़ांमध्ये पाणी शुद्धिकरणासाठी पुरेशी ब्लिचिंग पावडर नाही तर अनेक जिल्ह्य़ात निकृष्ट दर्जाचे ब्लिचिंग पावडर वापरले जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. त्यासंदर्भात चार लाख २६ हजार ५७ नमुन्यांपैकी ६५ हजार ९३० नमुने दुषित आढळले. ग्रामीण भागात भूजल पातळी खाली गेल्याने दूषित पाण्याच्या उपश्यातून ही समस्या आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी १५ टक्केपेक्षा कमी दूषित पाण्याची टक्केवारी आढळल्याचे ढोबळे म्हणाले. मात्र त्यावर समाधान न झालेल्या संजय दत्त यांनी राज्यातील दुषित पाण्याच्या समस्येमुळे उद्भवलेल्या विविध आजारांची माहिती देत सर्वात जास्त दूषित शहरांची नावे विचारली तर नीलम गोऱ्हे यांनी ब्लिचिंग पावडर टाकून काहीही उपयोग होत नसल्याची माहिती दिली. त्यावर २० टक्क्यांपेक्षा जास्त दूषित पाणी असल्याचे ठिकाणचे नमूने तपासून पाहिल्यानंतर योग्य उपाययोजनाही केली जाईल, असे आश्वासन ढोबळे यांनी दिले.
यवतमाळ जिल्ह्य़ातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या १२५ यंत्रणा अयशस्वी झाल्याचे संदीप बाजोरिया यांनी दुसऱ्या एका प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी संबंधित कामांची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये दूषित पाणी
राज्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड ही दूषित पाण्याची शहरे असून ६५ हजार ९३० पाण्याचे नमुने दूषित आढल्याची धक्कादायक माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी विधान परिषदेत दिली.

First published on: 20-12-2012 at 07:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polluted water in mumbai and several city in state