कोल्हापूरची नेमबाज सुवर्णकन्या राही जीवन सरनोबत हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ‘अर्जुन पुरस्कार’ मिळाला आहे.
या निर्णयाची माहिती मिळताच महाराष्ट्र फायफल असोसिएशनसह क्रीडाप्रेमींनी राहीवर अभिनंदनाचा वर्षाव केला. तिचे वडील जीवन सरनोबत यांनीही राहीच्या नेमबाजीतील कामगिरीची योग्य नोंद घेऊन केंद्र सरकारने तिच्या कामगिरीचा गौरव केल्याने मनापासून आनंद झाला असल्याचे ‘लोकसत्ता’ला गुरुवारी सांगितले.

२५ मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत राहीने ठसा उमटवला आहे. या क्रीडा प्रकारात ती आघाडीची भारतीय महिला खेळाडू आहे.कोल्हापूर येथे तिने नेमबाजीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. २००८ सालापासून तिची आंतरराष्ट्रीय कामगिरी खुलत गेली. त्यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत तिने पहिले सुवर्ण पदक मिळविले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने जकार्ता येथे झालेल्या यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.नवी दिल्लीमध्ये आठ वर्षपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली होती.

विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय पिस्तुल नेमबाज ठरली. चँगवॉन येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा तिने जिंकली होती. ग्लासगो येथे २०१४ साली पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळात,तिने पुन्हा सुवर्णपदकाची कमाई केली होती. यशाचा हाच क्रम कायम ठेवत तिने त्याच वर्षी इंचीऑन येथील कांस्यपदक जिंकले. राहीने २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदकमिळवले होते तर २०१२ साली लंडन ऑलिंपिकसाठी तिची निवड झाली.

राहीची ताजी कामगिरी म्हणजे यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा. मागील महिन्यात तिने या स्पर्धेत सहभागी होत तिच्या आवडीच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात ३४ गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून सुवर्णवेध साधला होता.या यशानंतर ती कोल्हापुरात आल्यावर तिची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. हा आनंददायी प्रसंग ताजा असतानाच आता तिला सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने आज पुन्हा एकदा करवीरनगरीत खुशीची लाट पसरली आहे.