राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार) पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ते मागील काही दिवसांपासून दाखल होते. वयोमान आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचे मल्टी ॲार्गन फेल्यूअरमुळे निधन झाले.

हेही वाचा – “हमारा बजाज…माझ्या अत्यंत जवळच्या मित्राच्या निधनाने …”; शरद पवार यांचं ट्वीट; राहुल बजाज यांना वाहिली श्रद्धांजली

राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


राहुल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.