निसर्गाचे विपुल वरदान लाभलेल्या कोकणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची अलोट गर्दी झाली आहे. मात्र येथील पर्यटनाचे अर्थकारण अद्याप सरकारच्या नियोजनात नसल्याने पर्यटनस्थळी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पर्यटक वर्षां सहलींचा फुकटचा लाभ घेतात. त्यांच्याकडून निधी आकारला तर त्यांना सोयी-सुविधा पुरवता येतील, तसेच या निधीतून देश-परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीच्या योजना बनविता येतील. मात्र याबाबतचे राज्य सरकारचे नियोजन
शून्य आहे.
अथांग सहय़ाद्रीचा पट्टा कोकण विभागाला लाभला आहे. त्यामुळे अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत. त्याचा फायदा देश-परदेशातील पर्यटकांना मिळवून दिल्यास वर्षां पर्यटनाची ‘टूर’ यशस्वी होऊ शकते.
१ आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी आणि दोडामार्ग तालुक्यातील मांगेली या ठिकाणी वर्षां पर्यटनासाठी होणारी गर्दी पाहता त्याचे नियोजन व्हायला हवे, पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.
२ आंबोली, चौकुळ व गेले या गावांमध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक येतात. आंबोलीत पर्यटकांच्या निवासाची सोय आहे, पण चौकुळ व गेले या ठिकाणी अशी सोय नाही. सरकारने जर अशी सोय केल्यास पर्यटकांची संख्याही वाढू शकेल.
३ आंबोली, मांगेली, नापणे, तसेच सहय़ाद्रीच्या पट्टय़ात अनेक धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटक येतात. पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी जाण्याची, कपडे बदलण्यासाठी सुविधा निर्माण व्हायला हवी.
*वाहन पार्किंगची सुविधा करताना ग्रामपंचायतीला वाहनतळ कर घेण्याची सवलत मिळायला हवी. काही पर्यटक पर्यटनाच्या ठिकाणी धिंगाणा करतात. त्यांच्यावर र्निबध आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
*वर्षां पर्यटनानिमित्ताने अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. राज्य सरकारने वर्षां पर्यटनाचे नियोजन आणि पॅकेज निश्चित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
*आंबोली आणि मांगेली या ठिकाणी वर्षां पर्यटनासाठी गोवा, कर्नाटक या राज्यातून पर्यटक येतात. त्यांच्याकडून पर्यटन शुल्क आकारल्यास स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनाही फायदा होऊ शकतो.
*सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. मात्र त्याचा फायदा होत असल्याचे दिसून येत नाही.
*केरळप्रमाणेच सिंधुदुर्गला निसर्गाचे वरदान आहे. मात्र केरळमध्ये पर्यटन व्यवसायात पायाभूत सुविधा आणि पर्यटनाचे पॅकेज निर्माण केले, तसे प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केलेले नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2014 रोजी प्रकाशित
कोकणातील पावसाळी पर्यटनाचे नियोजन शून्य..
निसर्गाचे विपुल वरदान लाभलेल्या कोकणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची अलोट गर्दी झाली आहे. मात्र येथील पर्यटनाचे अर्थकारण अद्याप सरकारच्या नियोजनात नसल्याने पर्यटनस्थळी पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

First published on: 29-07-2014 at 03:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain tourism planning ziro in konkan